LIVE STREAM

Amaravti GraminHelth CareLatest News

प्रहारचा सेवेचा वारसा निरंतर सुरू राहणार-बच्चू कडू स्व. ऋषभ गावंडे व स्व. सोपान कोरडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन रक्तदान शिबिरात ३१६ पिशव्या रक्त संकलन

चांदुर बाजार :- येथील आनंद सभागृह येथून प्रहारने पहिल्यांदा रक्तदान करून आपल्या सेवाकार्याची सुरुवात केली आणि आज लाखो रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्रहारच्या प्रत्येक कार्यकर्त्याने केलेली धडपड सर्वांनी याची देही याची डोळा बघितली आहे. ज्या कार्यकर्त्यांनी हजारो रक्तदान शिबीरे आयोजित केली, ज्यांनी अनेक रूग्णांचे प्राण वाचवले आज त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रक्तदान शिबीर अयोजित करणे वेदनादायी आहे मात्र त्यांच्या आणि प्रहारच्या या सेवेचा वारसा मात्र निरंतर सुरू राहणार यात तिळमात्र शंका नाही असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा माजी आ. बच्चू कडू यांनी आनंद सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात केले.

प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने प्रहारचे दिवंगत कार्यकर्ते स्व. ऋषभ गावंडे व स्व. सोपान कोरडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज (दि.९ डिसेंबर) आनंद सभागृह चांदुर बाजार येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.यावेळी या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बच्चू कडू बोलत होते.३१६ कार्यकर्त्यांनी या शिबिरात रक्तदान करून प्रहारच्या दिवंगत सेवकांना श्रद्धांजली अर्पण केली.

प्रहार हा कुण्या नेत्यांचा पक्ष नाही तर तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. प्रहारचा कार्यकर्ता जोपर्यंत सेवेचा झेंडा घेऊन गोरगरीब, वंचित, दिव्यांग,कामगार आणि शेतकरी बांधवांसाठी काम करेल तोपर्यंत बच्चू कडू कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून तेवढ्याच ताकदीने काम करेल त्यामुळे आपण निवडणूक हरलो काय अन जिंकलो काय याचा आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना कधीच फरक पडला नाही. आम्ही काही नसतांना सुद्धा जनतेचे काम प्राधान्याने केले आणि आजही आम्ही तेवढ्याच निष्ठेने जनतेची कामे करणार कारण सेवा भाव आमच्या रक्तात आहे असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

प्रहारचे कार्यकर्ते स्व. ऋषभ गावंडे व स्व. सोपान कोरडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आनंद सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. बच्चू कडू यांनी दोन्ही कार्यकर्त्यांच्या प्रतिमेला हारार्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली तसेच प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार विद्यार्गही संघटनेच्या वतीने सुद्धा श्रद्धांजली अर्पण करून दिवंगत कार्यकर्त्यांच्या आठवणींना व त्यांच्या कार्याला उजाळा दिला. संत गाडगेबाबा रक्तपेढी बडनेरा यांच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. यावेळी असंख्य कार्यकर्ते व नागरिक या श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित होते.

चौकट :-

कार्यकर्त्यांना अश्रू अनावर –

श्रद्धांजली सभेत बच्चू कडू आपल्या कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करत असतांना अनेक कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.यावेळी बच्चू कडू सुद्धा भावुक झाले होते.

चौकट :-

आतापर्यंत २७ मोठ्या रक्ततुला

प्रहार ने आतापर्यंत मोठ्या सत्तावीस रक्त तुला घेतलेल्या आहेत.प्रहारचा स्वतःचा 300 बॉटल रक्तदान केल्याचा रेकॉर्ड आहे,याशिवाय अण्णा हजारे, गोरा खैरनार, शहिदांच्या पत्नी, शहिदांच्या माता पिता व बच्चू कडू यांची सुद्धा रक्त तुला केल्याचा प्रहार चा रेकॉर्ड आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!