विभागीय लोकशाही दिनात 13 प्रकरणांवर सुनावणी प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
अमरावती, दि.९ : नागरिकांकडून प्राप्त अर्जावर विहित कालमर्यादेत कार्यवाही होणे आवश्यक आहे. विभागीय लोकशाही दिनाकरिता दाखल प्रकरणांचा संबंधित विभागाकडून वेळेत अहवाल प्राप्त करुन प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी सर्वंकष प्रयत्न करावे. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित तक्रारदारांना लेखी पत्राव्दारे कळविण्यात यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी दिले.
यावेळी लोकशाही दिनात दाखल एकूण 13 प्रकरणांवर चर्चा करुन त्यानुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.
विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात डॉ. पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली आज लोकशाही दिनाचे कामकाज पार पडले. याप्रसंगी त्या बोलत होते. अपर आयुक्त गजेंद्र बावणे, उपायुक्त संतोष कवडे यांच्यासह पोलीस, महापालिका, महसूल, सहकार, कृषी, जलसंधारण व ऊर्जा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाव्दारे सादर करण्यात आलेल्या 6 स्वीकृत अर्ज (प्रलंबित प्रकरणे) व 7 अस्वीकृत अर्ज (सामान्य तक्रार अर्ज) अशा एकूण 13 अर्जावर सविस्तर चर्चा आजच्या विभागीय लोकशाही दिनात झाली. तसेच आजच्या विभागीय लोकशाही दिनात दोन नवीन प्रकरणे दाखल झालीत.
यावेळी उपस्थित तक्रारदारांचे म्हणने ऐकूण घेण्यात आले. प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी संबंधित विभागांना यावेळी दिले.