आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते तीर्थस्थापना, पूजन व आरती करून दहादिवसीय महोत्सवाचा शुभारंभ
अमरावती दिनांक १४ डिसेंबर :- कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छता, सामाजिक सुधारणा व मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारातून अमरावती शहराच्या सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक विकासाची जडण -घडण झाली आहे. अमरावतीच्या विकासावर सुद्धा गाडगे बाबांच्या विचारांचा प्रभाव असल्याने संतनगरी म्हणून अमरावतीचा लौकिक आहे. अमरावतीमधील संत गाडगेबाबा समाधी स्थळ हे आपले श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ असून संतनगरीला कर्मभूमी समजून मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी संत गाडगेबाबांच्या विचारांचा वसा अविरतपणे जोपासणार असल्याचे प्रतिपादन अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी केले.
संत गाडगे महाराज समाधी मंदिर ट्रस्ट गाडगे नगर अमरावतीच्या वतीने शनिवार दिनांक १४ डिसेंबर ते २१ डिसेंबर पर्यंत आयोजित श्री. संत गाडगेबाबाचा ६८ वा पुण्यतिथी महोत्सव २०२४ च्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे विश्वस्त तथा श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख, संचालक सागर देशमुख, समाजसेवक डॉ. राजकुमारजी लंगडे, डॉ. नरेशचंद्रजी काठोळे , समाजभुषण- भरत रेळे महाराज, संचालक गजानन देशमुख, व्यवस्थापक प्रकाश महात्मे, अतुल रेळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम हरिनामाच्या गजरात आ.सौ. सुलभाताई खोडके यांचे भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आमदार महोदयांच्या हस्ते तीर्थस्थापना ,बाबांच्या समाधीचे पूजन व आरती करून पुण्यातिथी महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच अमरावती विधानसभा मतदार संघातून दुसऱ्यांदा निर्वाचित झाल्याबद्दल आ.सौ. सुलभाताई खोडके यांचा संस्थेचे विश्वस्त बाबसाहेब देशमुख यांनी शाल- श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत अभिनंदन केले.
पुढे बोलतांना आ.सौ. सुलभाताई खोडके म्हणाल्या की संत गाडगे बाबा यांनी दिन-दुखी, गोर-गरीब, निराश्रित ,अनाथ , दिव्यांग व वृद्धांच्या सेवेत आपले अख्य आयुष्य खर्ची घातले. बाबांच्या याच समाजसेवेचा वसा आजपर्यंत समाधी मंदिर ट्रस्ट जोपासत आली आहे. संस्थेचे सेवाभावी उपक्रम हे मानवतेचा संदेश देत असून या कार्याला आपणही हातभार लावणार असल्याचे सांगून मंदिर स्थळी चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत राहू अशा विश्वास आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला .
दरम्यान बाबांच्या वाहनाचे पूजन करून आरोग्य शिबिराचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले. आगामी १० दिवस चालणाऱ्या पुण्यतिधी महोत्सवात सामाजिक प्रबोधन कार्यक्रम, कीर्तन, हरिपाठ, व्याख्यान, सामाजिक शिबिरे तसेच गरजूनां ब्लॅंकेट वाटप व भोजनदान कार्यक्रम संपन्न होणार आहे. बाबांच्या ६८ व्या पुण्यतिथी महोत्सवात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांनी केले आहे.