होय, मीच तो ! १३ जणांचा बळी घेणाऱ्या स्फोटानंतर टँकर चालक पोलिसांसमोर ; संपूर्ण घटनाक्रम कथन

जयपूर :- जयपूर एलपीजी टँकर अपघात प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अपघातग्रस्त टँकरचा चालक सोमवारी पोलिसांसमोर हजर झाला. अपघातावेळचा घटनाक्रम त्यानं पोलिसांना सांगितला. टँकर पेटल्यानंतर अनेक वाहनं पेटली. या संपूर्ण अग्निकांडात १३ जणांचा बळी गेला. मग त्या टँकरचा चालक कसा काय वाचला, तो कुठे गेला, असे प्रश्न पोलिसांना पडले होते. आता चालकच समोर आल्यानं पोलीस चौकशीला वेग आला आहे.
जयवीर (४०) असं टँकर चालकाचं नाव आहे. तो उत्तर प्रदेशच्या मथुरेचा रहिवासी आहे. अपघातावेळी झालेल्या धडकेची तीव्रता लक्षात घेत जयवीरला संभाव्य धोका लक्षात आला. अपघातानंतर टँकरचं आऊटलेट नोजल तुटले होते. अपघात होताच जयवीरनं दिल्लीत असलेल्या टँकर मालक अनिल पवार यांना फोन केला. त्यानंतर त्यानं स्वत:चा मोबाईल बंद केला.
पोलीस उपायुक्त (पश्चिम) अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्ही टँकर चालकाला लगेचच दोषी ठरवू शकत नाही. कारण कंटेनर ट्रक चालकानं त्याच्या वाहनाला धडक दिली होती. टँकरचे नोजल तुटल्याचे त्याच्या लक्षात आलं. कोणत्याही क्षणी स्फोट होऊ शकतो हे त्यानं ताडलं. कारण अन्य चालक त्यांच्या वाहनांचं इग्निशन सुरु करत होते. त्यामुळे स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तो पळून गेला.
या प्रकरणात २० डिसेंबरला एफआयआर नोंदवण्यात आला. त्याच दिवशी स्फोट झाला होता. त्यानंतर आता टँकर चालकाची चौकशी सुरु आहे. टँकरशी झालेल्या धडकेनंतर कंटेनर ट्रक चालकाचा स्फोटात मृत्यू झाला. जयवीर सोमवारी पोलिसांसमोर हजर झाला. या प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे. टँकर मालक अनिल पवार आणि टँकर कंपनी वाहनाच्या स्थिती आणि चालकाच्या पार्श्वभूमीची चौकशी करणार आहे.
जयपूर-अजमेर महामार्गावर यू टर्न घेताना कंटेनर ट्रक एलपीजी टँकरला धडकला. त्यामुळे त्याचं नोजल तुटलं. यानंतर वायू आसपासच्या परिसरात पसरला. काही मिनिटांतच वायूनं पेट घेतला. आगीच्या गोळ्याच्या भक्ष्यस्थानी ३० पेक्षा अधिक वाहनं पडली. यामध्ये २४ हून अधिक जण जखमी झाले. आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १८ जणांची प्रकृती गंभीर आहे.