बीडमधील आक्रोश मोर्चाला लोकांची मोठी गर्दी

बीड :- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलीये. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक गंभीर आरोप झाले. आज बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा हा काढण्यात आलाय. या मोर्चाला लोकांनी मोठी गर्दी केलीये. राज्यातील अनेक मोठे नेते या मोर्चात सहभागी झाले. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर लोकांमध्ये मोठा संताप बघायला मिळतोय. जितेंद्र आव्हाड हे देखील बीडमध्ये पोहोचले आहेत. डोक्याला काळ्या पट्ट्या आणि हातात संतोष देशमुख यांचे बॅनर घेऊन लोक मोर्चात सहभागी झाले आहेत.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्ये प्रकरणी आज 28 डिसेंबर रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. या विराट सर्वपक्षीय मोर्चामध्ये बोलताना सर्व पक्षीय नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी करतानाच त्यांना बीडचे पालकमंत्रीपद सुद्धा देऊ नये, अशी मागणी एकमुखाने केली. बीडमधील दहशतीला मुंडे कारणीभूत असल्याचा आरोप अनेक नेत्यांनी केला. मूक मोर्चाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, अभिमन्यू पवार, नरेंद्र पाटील, ज्योती मेटकर आणि दीपक केदार यांनी संबोधित केले. संतोष देशमुख यांची कन्या वैभवीने सुद्धा मोर्चाला संबोधित केले. यावेळी वैभवीने काल ढगाआड गेलेला सूर्य आज दिसतोय, पण माझे वडिल कधीच दिसणार नाही म्हणताच मोर्चातील जनता गहिवरली.
या विराट मूक मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसह सामान्य नागरिक सुद्धा सहभागी झाले. आम्ही न्याय मागण्यासाठी आलो आहोत, आम्हाला न्याय द्यावा अशी एकमुखाने मोर्चातून मागणी करण्यात आली. बीडमधील या विराट मोर्चाला जिल्ह्यातील जनतेचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सरकारवर, वाल्मिक कराडवर कारवाईसाठी दबाव वाढल्याची चर्चा रंगली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल 19 दिवस उलटून गेल्यानंतरही प्रमुख आरोपी अजूनही सापडत नसल्याने आणि खंडणीखोर वाल्मिक कराड अजूनही फरार असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जर आरोपी सापडले नाही तर आणि जातीयवादी मंत्र्याला पोसणार असाल, तर दंडूक हाती घ्यावं लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तर माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी जर धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद दिल्यास छत्रपती घराणे या जिल्ह्याचे पालकत्व घेईल असे सांगितले. बीडचा बिहार करायचा आहे का ? असा सवाल देखील संभाजीराजेंनी केला.
तुम्हाला मंत्रीपद आमचे मुडदे पाडायला हवे आहे का? यांच्यावर बोलण्याइतपत हा मोठा नसल्याची घणाघाती टीका खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. तुम्ही वाल्मिक का म्हणता? हा वाल्मिक नाही वाल्या आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला होता पण इथं वाल्मिकीचा वाल्या झाला असल्याचे आव्हाड म्हणाले. वेळेत कारवाई झाली नाहीतर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नसल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. आमदार सुरेश धस यांनी पैसे गेले तरच फाईल मंजूर होतं होती. ही आमच्या जिल्ह्याची करूण कहाणी, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.
वाल्मिक कराडला सारंक्षण धनंजय मुंडेचं असल्याचे बोलले जाते. वाल्मिक कराड अटक झाली पाहिज. फास्ट ट्रॅकमध्ये केस चालली पाहिजे. जोपर्यंत तपास होतं नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली. कोपर्डीचे ज्या पद्धतीने मोर्चे निघाले, संतोष देशमुख हत्येविरोधात देखील राज्यभरात मोर्चे निघतील. दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. वाल्मिक कराड असो किंवा कोणीही असो, कितीही मोठा आरोपी असला तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे. या मोर्चाची दखल सरकारने घ्यावी, असं अभिमन्यू पवार यांनी सांगितले. संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 19 दिवस पूर्ण झाली आहेत. त्यांच्या मुख्य मारेकरी पोलिसांच्या ताब्यात आहे. इतर अजूनही फरार आहेत. आरोपींच्या अटकेसाठी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळून देण्यासाठी आज बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता.
दरम्यान बीड प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CID चे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना दिले आहेत. बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असेही आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. शिवाय तातडीने फेर आढावा घेण्यासही सांगण्यात आले आहे.