बच्चू कडूंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे धाडला राजीनामा, पत्रात 6 मुद्दे मांडत उघड नाराजी
बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियानच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बच्चू कडू यांनी त्यांचा राजीनामा पाठवला आहे. एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय तयार केलं होतं, ज्याचं अध्यक्षपद बच्चू कडू यांना दिलं गेलं. या महामंडळाच्या अध्यक्षाला मंत्रिपदाचा दर्जाही देण्यात आला होता. पण आता 6 मुद्दे मांडत बच्चू कडू यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
दिव्यांग मंत्रालय निर्माण केल्याबद्दल मा श्री एकनाथजी शिंदे साहेब व आपले आभार.
मंत्रालय निर्माण झाले परंतु,
१. इतर राज्यांपेक्षा दिव्यांगाना महाराष्ट्रा मध्ये मिळणारे मानधन सर्वात कमी आहे.
२. मिळणारे मानधन वेळेवर कधीच मिळत नाही.
३. स्थानिक स्वराज्य संस्था ५% निधी खर्च करत नाही.
४. अजूनही स्वतंत्र मंत्री नाही आणि सचिव पण नाही.
५. जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय नाही. पद भरती नाही.
६. इतर अनेक गोष्टी ज्या झाल्या नाही.
या पदावर राहून ते होणार अशी शक्यता मावळली आहे. म्हणून दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी मला आंदोलने करावी लागणार. पदावर राहून आंदोलन करणे शक्य नाही, दिव्यांगासोबत बेईमानी कदापि शक्य नाही. म्हणून मी माझा राजीनामा देत आहे. लो मंजूर करून सहकार्य करावे तसेच मला असलेली सुरक्षा सुद्धा काढून टाकावी कुठलीही सुरक्षा ठेवण्यात येऊ नये, असं बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात लिहिलं आहे.