जळगावमध्ये आगीच्या भीतीने प्रवाशांनी रेल्वेतून मारल्या उड्या, दुसऱ्या रेल्वेखाली येऊन 11 प्रवाशांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात परधाडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत रेल्वेखाली येऊन किमान 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे विभाग भुसावळच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात ट्रॅकवर उभ्या असलेल्या पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांना असं वाटलं की त्यांच्या रेल्वेला आग लागली आहे. त्या भीतीने त्यांनी रेल्वेतून समोरच्या ट्रॅकवर उड्या मारल्या. त्याच वेळी कर्नाटक एक्सप्रेस ट्रॅकवर आली आणि त्यात काही जणांचा चिरडून मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. या अपघातात किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर, अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, “जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”
“माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत.”
फडणवीस पुढे म्हणाले, “8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे.
“ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे,” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.
रेल्वे दुर्घटनेवर राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मला जळगाव एसपींचा फोन आला, मी थोड्याच वेळात घटनास्थळी पोहचत आहे. त्यानंतर अधिक माहिती स्पष्ट होईल. अतिशय दुर्देवी अशी घटना घडली आहे. नेमकं काय घडलं? किती मृत्यू झाले, किती जखमी आहेत हे तिथे पोहचून कळेल. सध्याच्या परिस्थितीबाबत फोनवरुन कळालं आहे. काही जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.”
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला घटनेबाबत माहिती देताना म्हणाले, “लखनौवरून मुंबईकडे येणारी पुष्पक एक्सप्रेस ही माहेजी आणि परधाडे स्टेशनदरम्यान अलार्म चेन पुलिंगमुळे थांबली होती. यावेळी ट्रेनमधील काही प्रवाशी बोगीतून खाली उतरले होते.
दरम्यान, विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कर्नाटक एक्प्रेसखाली येऊन या प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, जखमी प्रवाशांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने रेल्वे प्रशासनातर्फे घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरु आहे.”