संत्रा उद्योगाला नवा बूस्टर! अचलपूरच्या ‘बालाजी ऑरेंज पॅकिंग सेंटर’मधून देशभर निर्यात – शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

अमरावती :- अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये संत्रा प्रक्रिया उद्योगाला नवे बळ मिळत आहे. ‘बालाजी ऑरेंज पॅकिंग सेंटर’च्या माध्यमातून संत्र्याला आधुनिक वॅक्सिंग प्रक्रिया केली जात असून, यामुळे त्याचे शेल्फ लाईफ १०-१२ दिवसांपर्यंत वाढत आहे. यामुळे संत्र्याच्या विक्रीसाठी व्यापाऱ्यांना मोठी संधी निर्माण झाली आहे आणि शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे.
शेतातून संत्रा तोडल्यानंतर तो नीट धुतला जातो, त्यानंतर त्याला वॅक्सिंग करून साठवले जाते. त्यामुळे संत्र्याची ताजेपणा टिकून राहतो आणि दीर्घकाळ साठवणूक शक्य होते.अचलपूरमध्ये असे प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर उभारल्यास जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक चांगली बाजारपेठ मिळू शकते. त्यामुळे सरकारने या दिशेने पावले उचलावीत, अशी मागणी संत्रा उत्पादकांनी केली आहे.
अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर संत्रा उत्पादन घेतले जाते. विशेषतः मृगबहार आणि अंबिया बहार या दोन ऋतूंमध्ये संत्र्याचे उत्पादन शिखरावर असते. त्यामुळे संत्रा विक्रीसाठी मोठी बाजारपेठ निर्माण होत आहे.यंदाच्या उन्हाळ्यात संत्र्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता असून, उत्पादकांसाठी ही दिलासादायक बाब असली तरी ग्राहकांना मात्र किंमतीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
अचलपूरमध्ये सुरू झालेल्या या नवीन उपक्रमामुळे संत्रा उत्पादकांना मोठा आधार मिळणार आहे. स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर संत्र्याची मागणी वाढत असताना, राज्य सरकारने या उद्योगाला अधिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी व्यक्त करत आहेत. प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींसाठी ‘सिटी न्यूज’सोबत राहा.