12 वीच्या परीक्षेत विद्यार्थ्याला वडिलांचे नावच सांगता येईना; भरारी पथकाने असा पकडला डुप्लीकेट परीक्षार्थी

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने 12 वीच्या परीक्षेदरम्यान कारवाई करत एका तोतया परीक्षार्थीलारंगेहात पकडले आहे. या घटनेमुळं परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत शिक्षण विभागाने कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. तोतया परीक्षार्थींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसा पकडला डुप्लीकेट परीक्षार्थी?
सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. यातच परीक्षेदरम्यान भरारी पथकाने तुर्काबाद खराडी येथील हरी ओम ज्युनियर कॉलेज (परीक्षा केंद्र क्र. 0058) येथे अचानक भेट दिली. त्यावेळी 12 वाणिज्य शाखेचा वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हा पेपर सुरू होता. या केंद्रावर एकूण 29 विद्यार्थ्यांची नोंद असून त्यापैकी 27 विद्यार्थी परीक्षेला हजर होते. तर दोन विद्यार्थी अनुपस्थित होते. पथकाने केंद्राची तपासणी सुरू केली असता एका परीक्षार्थीबाबत शंका निर्माण झाली. अधिकाऱ्यांनी त्याला वडिलांचे नाव विचारले असता, तो त्याच्या वडिलांचे नाव सांगू शकला नाही. तसेच, त्याच्या हॉल तिकीटवरील जन्मतारखेमध्ये पेनने खडाखोड केल्याचे आढळले. विशेष म्हणजे, हॉल तिकीटावर परीक्षा केंद्र संचालकाची सही आणि शिक्का देखील नव्हता. त्यामुळं भरारी पथकाने त्या तोतया विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. त्या परीक्षार्थींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12 वी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठीचे अभियान
राज्यातील 12वी बोर्ड परीक्षेला (Exam) काल(11 फेब्रुवारी) पासून सुरुवात झाली. राज्यात अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपीची (Copy) प्रकरणे उघडकीस आली आहेत. याप्रकरणी, भरारी पथकाने नोंद घेत संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारकडून यंदा 12 वी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठीचे अभियान जोमाने चालवले जात आहे. त्यासाठी, विशेष प्रयत्न केले जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संदर्भात कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणी परीक्षा केंद्राबाहेर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. मात्र या बंदोबस्ताला न जुमानता अनेकांनी कॉप्या पुरवण्याच्या उद्योग केला आहे. काही टिकाणी थेट विद्युत रोहित्राजवळ असलेल्या खांबावर चढून स्वतःचा जीव धोक्यात घालत कॉपी पुरवण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत.