विद्यापीठात योगाच्या माध्यमातून आनंदी जीवनाचे व्यवस्थापन विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे 1 मार्च रोजी आयोजन

अमरावती :- प्रधानमंत्री उच्च स्तर शिक्षा अभियान(पीएम-उषा)अंतर्गत योग व निसर्गोपचार या विषयाला जागतिक कीर्ती प्राप्त व्हावी, याचबरोबर भावनिक व मानसिक स्वास्थ निरोगी व सुदृढ रहावे तसेच आजच्या धकाधकीच्या काळात आदर्श जीवनाचे व्यवस्थापन योगामार्फत व्हावे, हा उदात्त हेतू ठेवून आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व युजीसी – मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर यांचे संयुक्त विद्यमाने दि. 1 मार्च, 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता क्रीडा व रंजन विभाग मैदान येथे, तर 9.30 वाजता विद्यापीठ परिसरातील दृकश्राव्य सभागृह येथे एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेच्या माध्यमातून शरीराची लवचिकता, वक्रता, स्थिरता आणि दृढता याचबरोबरच मेंदूवर होणारा तणाव यापासून मुक्त करण्याचे तंत्र, योग व निसर्गोपचार पद्धतीवर आधारित तणाव मुक्ती तंत्राचा वापर आदींची माहिती दिली जाणार आहे. उदा, आहार, हायड्रेशन, निसर्गोपचार, भावनिक आणि मानसिक आरोग्याबद्दल गैरसमज आणि तथ्य यावर तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार असून योगाविषयी समाजात झालेला गैरसमज कसा दूर करावा, याबाबत सुद्धा कार्यशाळेत मार्गदर्शन होईल.
‘करो योग रहो निरोग’ याप्रमाणे योगाची मदत घेऊन मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी या कार्यशाळेमध्ये पोषक वातावरण निर्माण करण्याचा हेतू आहे. यामध्ये अनेक योग विषयक विचारांवर उदा:बेरोजगारी, कौटुंबिक हिंसाचार, पाल्यांविषयी असलेली चिंता व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आर्थिक तंगीमुळे वाढलेला मानसिक दबाव या सर्व महत्त्वपूर्ण घटकांवर कार्यशाळेच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करणे, हा यामागील उद्देश आहे.
सदर कार्यशाळा योगाच्या माध्यमातून भावनिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी आदर्श जीवनशैलीचे व्यवस्थापन करण्यास उपयुक्त ठरणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त नोंदणी करून या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले आहे.