खोट्या गुन्ह्यात अडकवलं, पैसे न दिल्याने पोलीस ठाण्यात बोलावायचे; विद्यार्थ्याचा टोकाचा निर्णय

अकोला :- अकोला शहर आता शिक्षणाचे माहेर घर होत आहे. इतर जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आता अकोला शहराकडे वळत आहेत. उच्च शिक्षणाची आणि शिकवणी वर्गाची सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी हे अनेक स्वप्न घेऊन अकोला शहरात येतात. असेच काही स्वप्न घेऊन आलेल्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे. मात्र, या घटनेमागे नागरिकांच रक्षण करणारे पोलीस असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
अकोला शहरातील आकाशवाणी केंद्राच्या मागे असलेल्या जलाराम सोसायटीमध्ये ११ वित शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. प्रसन्न वानखडे अस मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रहिवासी आहे. प्रसन्न हा (NEET) नीटच्या परीक्षेची तयारी करत होता. दीड महिन्यापूर्वी एका विद्यार्थ्याचा प्रसन्न सोबत वाद झाला होता आणि यातूनच प्रसन्नला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आलं होतं, असा आरोप प्रसन्नच्या मामाने केला आहे.
प्रसन्नवर कारवाई न करण्याकरिता सिव्हिल लाईन पोलीस येथील एक पोलीस तपास अधिकारी सतत पैशाची मागणी करत होता. मात्र, पैसे न दिल्याने प्रसन्नला ठाण्यात बोलून मानसिक त्रास द्यायचा, असा आरोप प्रसन्नच्या मामाने केला आहे. पोलिसांच्या जाचामुळे प्रसन्नने आत्महत्या केली असून संबंधित पोलिसांवर आणि खोटी तक्रार देणाऱ्या विद्यार्थी वर कारवाई करण्याची मागणी प्रसन्नच्या नातेवाईकांनी केली आहे.
प्रसन्न हा शेतकरी कुटुंबातील
प्रसन्न हा बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकरचा शेतकरी कुटुंबातला पोरगा होता. प्रसन्न उच्च शिक्षित होऊन, मोठा व्यक्ती झाला पाहिजे एवढेच त्याच्या आई-वडिलांचे स्वप्न होते. म्हणून त्याला जेईईच्या शिक्षणासाठी अकोल्यात पाठवले होते. मात्र, प्रसन्नने आपली जीवनयात्रा संपवल्याने त्यांचं स्वप्न भंगल आहे. पालक मोठ्या आशेने आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवतात, आपली मुलं मोठं होऊन उच्च शिक्षित होतील, प्रगती करतील, अशी आशा त्यांना असते. या आशेपोटीच ते मनावर दगड ठेवून मुलांना बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवतात. प्रसन्नच्या या निर्णयाने त्याच्या कुटुंबासह संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.