‘महाराष्ट्राची जी अवहेलना गेल्या तीनेक वर्षांत आमच्याच नेत्यांनी केली त्यावर…’; राऊतांचा हल्लाबोल

“इतिहासाची पुनरावृत्ती सतत होत असते याची प्रचीती देणारा काळ सध्या महाराष्ट्रात चालू आहे. मराठ्यांतील दुही, घरचेच वासे राज्याला काळ झालेले ही स्थिती पाहून व्यथित मनाने शिवाजी महाराजांनी रायगडावर आपला देह ठेवला. त्यांची जयंती आणि पुण्यतिथी आपण साजरी करतो. 19 फेब्रुवारी रोजी शिवनेरीवर शिवरायांचा जन्मोत्सव साजरा झाला. तेथेही या दुहीचे दर्शन झाले. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातील कटुतेचे दर्शन किल्ले शिवनेरीवर झाले व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्याची मजा घेत राहिले. छत्रपती संभाजी यांच्यावरील ‘छावा’ चित्रपट सध्या सुरू आहे. दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधानांनी ‘छावा’ चित्रपटाचा विशेष उल्लेख केला तो मोगलांनी संभाजीराजांना कसे मारले ते पहा व भाजपला मते द्या, असे अप्रत्यक्ष सांगण्यासाठी. संभाजीराजांना पकडून देणारे व स्वराज्याची वाताहत करणारे फितूर आपलेच होते व त्यांना दिल्लीचा वरदहस्त होता हे स्वीकारले तर आज महाराष्ट्राच्या नशिबी पुन्हा तेच दुर्भाग्य आले आहे. महाराष्ट्र मनाने जातीपातीत दुभंगला आहे व त्याचा फायदा दिल्ली घेत आहे. स्वाभिमानासाठी ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्य आज राजकारणाच्या मोहमायेमुळे शरणागत झालेले स्पष्ट दिसते,” असं राज्यसभेचे खासदार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
‘पेटंट’चे कार्यालयही आता दिल्लीत हलवले
“प्रतिष्ठेवर घाव महाराष्ट्रातील संपत्ती आणि उद्योग गुजरातमध्ये जात आहेत हे आता नित्याचेच झाले. ‘पेटंट’चे मुख्यालय मुंबईत होते. आठ दिवसांपूर्वी बातमी आली, हे ‘पेटंट’चे कार्यालयही आता दिल्लीत हलवले. एकदम अहमदाबादला नेले तर बोंब होईल म्हणून आधी दिल्लीत व नंतर अहमदाबादला नेले जाईल. बेळगावात मराठी लोकांवर नव्याने हल्ले सुरू आहेत व फडणवीस, शिंदे, पवार हे त्रिकूट त्यावर बोलायला तयार नाही. त्यामुळे मराठी भाषा दिन व पुरस्कार वितरण वगैरे सोहळे व्यर्थ आहेत. मंत्रालयातील कारभार पूर्णपणे मराठीतच चालावा असे नवे फर्मान मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा काढले. त्याने काय होणार?” असा सवाल राऊतांनी ‘सामना’मधील ‘रोखठोक’ सदरातून उपस्थित केला आहे.
वतनदाऱ्यांसाठी दिल्लीचे पाय चाटत
“ठाणे महापालिकेतील मराठी भाषेत पदवी मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार कापण्याचे फर्मान एकनाथ शिंदे यांनी सोडले आहे. पारतंत्र्याच्या काळात राज्यभाषा नसतानाही मराठी भाषेबद्दलचे प्रेम येथील रहिवाशांच्या मनात काठोकाठ भरलेले होते. स्वराज्य आणि स्वातंत्र्याच्या वातावरणात स्वभाषेच्या सर्वांगीण वाढीला विपुल वाव असतो, पण संघर्षाच्या काळात तिच्याबद्दलचे प्रेम आणि अभिमान कडवा होत असतो हे चित्र आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्यात आणि शिवसेनेच्या निर्मितीच्या वेळी पाहिले. मराठी माणसाला प्रतिष्ठा मिळाल्याशिवाय मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळणार नाही ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती व त्यांनी ते कार्य केले, पण आज मराठी माणसाला प्रतिष्ठाच राहिलेली नाही. मराठी माणसाच्या प्रतिष्ठेसाठी निर्माण झालेल्या शिवसेनेवरच दिल्लीने घाव घातला. शिर्के फक्त संभाजीराजांच्या काळातच नव्हते, आजही आहेत, तर सरदेसायांच्या वाड्यातील अनाजीपंत व फितुरी करणारे सरकारकून आजही महाराष्ट्रात आहेत आणि राजकीय वतनदाऱ्यांसाठी दिल्लीचे पाय चाटत आहेत. हे चित्र महाराष्ट्रासाठी बरे नाही,” असा टोला राऊतांनी लगावला आहे.
त्यांना एकदा सांगावेसे वाटते की…
“शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हे भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटले. त्यामुळे पवारांचा अखेरचा मालुसराही चालला अशा अफवांनी पेट घेतला. रोज कोणीतरी इथून तिथे जातच आहे. शिवाजी महाराजांच्या काळात मराठा सरदार या शाहीकडून त्या शाहीकडे चाकरीसाठी जात होते. वतनदाऱ्या मिळाव्यात हा त्यांचा मुख्य हेतू होता. आज तरी वेगळं काय सुरू आहे? शिवाजी महाराज व संभाजी महाराजांची नावे घेऊन राजकारण करायचे. शिवाजी महाराजांच्या काळात आपण जसे वागलो तसे वागता कामा नये असे काही त्यांच्याविषयी अभिमान बाळगणाऱ्या आजच्या मराठा नेत्यांना वाटत नाही. दुही व विश्वासघात यांचे राजकारण त्या काळातही चालले. आजही चालले आहे. पुन्हा सगळे एकाच माळेचे मणी. एकूण महाराष्ट्राची जी अवहेलना गेल्या तीनेक वर्षांत आमच्याच नेत्यांनी केली त्यावर कळस चढविण्याचे उद्योग आता रोजच सुरू आहेत. त्यांना एकदा सांगावेसे वाटते की, शिवाजी महाराज, संभाजीराजांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्याचा आणि त्यांचे पुतळे उभारण्याचा कसलाही हक्क तुम्हाला नाही,” असं राऊतांनी म्हटलं आहे.