LIVE STREAM

Crime NewsLatest NewsMaharashtra

गोव्यात पाच वर्षीय चिमुकलीचा जमिनीत गाडलेला मृतदेह आढळला; दोघांना ताब्यात घेण्यात आले

रत्नागिरी :- पूर्वी रत्नागिरीत राहत असलेल्या चिमुरडीचा गोव्यात जादूटोण्यासाठी नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करणारा धक्कादायक, संतापजनक घटना प्रकार गोव्यात घडला आहे. बेपत्ता ५ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह घराच्या बाजूलाच गाडलेल्या स्थितीत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. कसलये-तिस्क फोंडा येथे हा प्रकार उघडकीस आला आहे.

शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीकडून चिमुकलीची हत्या

घराच्या बाजूला मुलीचा मृतदेह जमिनीत गाडलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत मुलीचे नाव अमेरा ज्युडान अन्वारी (वय ५) असे असून, ज्या घराशेजारी हा मृतदेह गाडलेल्या स्थितीत होता, त्या घराच्या मालकाला पत्नीसह फोंडा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घराच्या बाजूलाच या मुलीला मारून पुरल्याचे अलाट नावाच्या या पती-पत्नीने कबूल केले. त्यामुळे संशयित पप्पू ऊर्फ बाबासाहेब अलाट आणि त्याची पत्नी पूजा अलाट या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त केल्या असून हा जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकालाही पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली आहे. चिमुकलीचा खून करण्यात आला की नरबळी याचे गूढ अद्याप कायम असून पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी हा प्रकार खुनाचा गुन्हा म्हणून नोंद केला असून, पुढील चौकशी सुरू आहे. दरम्यान, हा जादूटोण्याचा प्रकार असल्याचा संशय स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. कसलये-तिस्क येथील अमेरा अन्वारी ही चिमुरडी काल शनिवारी सकाळपासून बेपत्ता होती. यासंबंधी फोंडा पोलीस स्थानकात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

‘नरबळी’ दिल्याचा संशय

मात्र, ही मुलगी आपल्या आईसह राहत असलेल्या घरासमोरील सुमारे ५० मीटर अंतरावरील अलाट कुटुंबीयाच्या घरी ये-जा करत होती म्हणून पोलिसांनी अलाट पती-पत्नीकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. घराच्या बाजूलाच या मुलीला मारून पुरल्याचे अलाट पती-पत्नीने कबूल केले. त्यामुळे संशयित पप्पू ऊर्फ बाबासाहेब अलाट व त्याची पत्नी पूजा अलाट या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी आणि अलाट कुटुंबीय परप्रांतीय असून मागील अनेक वर्षे गोव्यात राहत आहेत. पप्पू आणि त्याची पत्नी पूजा या दांपत्याला मूलबाळ नाही. त्यामुळे मूलबाळ होण्याबरोबरच समृद्धी मिळावी, या हेतूनेच हा ‘नरबळी’ दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अमेरा बुधवारी सकाळपासून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली होती.

पोलिसांच्या चौकशीत पती-पत्नी गडबडले आणि जाळ्यात अडकले

त्यानंतर फोंडा पोलीस स्थानकात अमेराच्या आईने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. फोंडा पोलिसांनी तपासाला वेग देताना वस्तीत घरोघरी सखोल चौकशीला प्रारंभ केला. बाबासाहेब याच्याकडे बुधवारी चौकशी केली असता तो थोडा गडबडला होता. गुरुवारी पुन्हा त्याची चौकशी केली असता तो असंबध उत्तरे देऊ लागला आणि येथेच अडकला.

बाबासाहेब हा एक वेल्डर आहे. कसलये येथे राहण्यापूर्वी तो धारबांदोडा संजीवनी साखर कारखान्याजवळ राहत होता. लग्नाला वीस वर्षे उलटली तरी या दांपत्याला मुलबाळ होत नव्हते, त्यामुळे त्याने जादू टोण्याने मूल व्हावे, समृद्धी यावी यासाठी हे अघोरी कृत्य केले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिस त्यादृष्टीने चौकशी करत आहेत. अमेरा अन्वारी ही आपल्या आई आणि एका भावंडासह कसलये येथे राहत होती. अमेराची आईला लग्न करून रत्नागिरीला दिले होते. पण नवरा मारझोड करत असल्याने ती दोन्ही मुलांसह कसलये येथे आपल्या आईच्या घरी वर्षभरापूर्वी रहायला आली होती.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!