नागपूर हिंसाचारानंतर ५ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवण्याचा निर्णय

नागपूर :- औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलेले असताना नागपूरमध्ये सोमवारी मोठा राडा झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी पेट्रोल बॉम्ब, दगडफेक करून गाड्यांचे मोठे नुकसानही करण्यात आले. या हिंसाचाराचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल देखील झाली. पोलिसांनी या हिंसाचारात आतापर्यंत अनेकांना ताब्यात घेतले. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या दाैऱ्यावर होते. त्यांनी यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली आणि स्पष्ट केले की, हिंसाचारामध्ये झालेले सर्व नुकसात हे आरोपींकडूनच भरून काढले जाईल.
या हिंसाचारामध्ये पोलिसांना टार्गेट केले जात होते. अनेक पोलिस कर्मचारी आणि अधिकारी या हिंसाचारामध्ये गंभीर जखमी झाले. हेच नाही तर हिंसाचार करणाऱ्यांनी महिला पोलिसांसोबतचे चुकीचे वर्तन केले. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दाैऱ्यात नागपूरच्या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. सोमवारी हिंसाचार झाल्यानंतर संचारबंदीचे आदेश देण्यात आले होते. या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार देखील पोलिसांच्या ताब्यातच आहे.
आता नागपुरचे जनजीवन हे हळूहळू सुरळीत होताना दिसतंय. नागपुरमधील पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय. यामध्ये पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडाचा समावेश आहे. गणेशपेठ, तहसील, कोतवालीमध्ये संचारबंदी ही कायम आहे. नागपुरच्या चार पोलिस ठाणे हद्दीत अजूनही संचारबंद ही कायम आहे. यामध्ये संध्याकाळी सात ते दहामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली तर रात्री दहानंतर संचारबंदी ही कायम असेल.
देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरच्या पोलिस आयुक्तांकडून कालच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांनी एक पत्रकार परिषद घेत देखील नेमके काय घडले आणि काय सुरू आहे हे स्पष्ट केले. नागपुरमध्ये मोठ्या हिंसाचाराची घटना घडल्यानंतर पहिल्यांदाच काल देवेंद्र फडणवीस हे नागपूर दाैऱ्यावर होते. हिंसाचार झाल्यानंतर ते नागपुरच्या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. आज फडणवीस हे नाशिकच्या दाैऱ्यावर आहेत.