पुण्यात तडीपारीची कारवाई फक्त नावालाच; २६७ गुंडांनी आदेशाचा भंग केला, हिंसक घटनांमध्ये वाढ

पुणे :- एखाद्या भागातील गुंडांची दहशत संपविण्यासाठी पोलिसांकडून संबंधितांवर तडीपारीची कारवाई केली जाते. मात्र, ही कारवाई नावालाच होते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी गेल्या वर्षी (२०२४मध्ये) २८९ गुंडावर तडीपारीची कारवाई केली. तरीही त्यातील बहुसंख्य गुंडांचा पुन्हा शहरात वावर असल्याचे दिसून आले आहे. तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात आलेल्या २६७ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
वाहनांची तोडफोड, दोन गटांमध्ये हाणामारी, धारदार हत्यारे हवेत फिरवत रस्त्याने जाणे, अशा प्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. ही दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांकडून विविध प्रकारे प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. त्यानंतरही गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसलेला नाही. शहरात तडीपार गुंडांकडून जबरी चोरी, घरफोडी, खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे केल्याचे शहरात घडलेल्या काही घटनांत आढळून आले आहे. तडीपारीची कारवाई झालेले गुंड पुन्हा शहरात येऊन दहशत माजवित आहेत.
तडीपार केल्यानंतर संबंधित गुंडावर नंतर नजर ठेवली जाते का, तो पुन्हा शहरात येऊन गुन्हा करतो, तोपर्यंत पोलिसांना याची खबर का लागल नाही, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. पुणे शहरातल अलीकडील काळात कोयते नाचवणे, किरकोळ कारणावरून मारहाण करणे अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. सराईत गुंडांवरील कारवाईनंतरही या घटना घडत असल्याचे चित्र आहे.