काटेपूर्णा धरणात ०.३४% वाढ, अकोला जिल्ह्यात पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची आशा

अकोला :- अकोला जिल्ह्यातील महत्त्वाच्या जलस्रोतांपैकी एक, काटेपूर्णा धरणाच्या जलसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.३४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या धरणाच्या जलसाठ्यामुळे अकोला शहर, मूर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोला एमआयडीसी आणि उन्नई-खांभोरा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी आनंदाची बातमी आहे.
अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठं आणि दहा दरवाज्यांचं धरण, काटेपूर्णा धरण, सध्या ०.३४ टक्के अधिक जलसाठा दाखवत आहे. २०२३ मध्ये कमी पाऊस झाल्यामुळे या धरणाचा जलसाठा ८१.३२ टक्के होता. मात्र, २०२४ मध्ये झालेल्या भरपूर पावसामुळे धरण ऑगस्ट महिन्यातच १०० टक्के भरलं होतं आणि त्यानंतर अतिरिक्त पाणी नदीपात्रात विसर्जित करण्यात आलं. काटेपूर्णा धरण हे अकोला शहरासह मूर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोला एमआयडीसी आणि उन्नई-खांभोरा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी महत्त्वाचं जलस्रोत आहे.
संपूर्ण अकोला जिल्ह्यातील ६४ गावांचे पाणीपुरवठा आणि मत्स्य उद्योग सध्या काटेपूर्णा धरणाच्या जलसाठ्यावर अवलंबून आहेत. २०२४ मध्ये झालेल्या भरपूर पावसामुळे या धरणाची स्थिती सुधारली आहे, आणि आगामी काळात पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची आशा व्यक्त केली जात आहे.