बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी धोरणात्मक बदलांची आवश्यकता – डॉ. किर्दक

अमरावती :- बेरोजगारिता ही समकालीन भारतातील एक भीषण समस्या आहे. विदर्भातही तिचे प्रमाण मोठे आहे. बेरोजागारिता वाढण्याचे विविध कारणे असून यामध्ये कृषिक्षेत्रातील संकटे, प्रतिष्ठीत आणि सुरक्षित रोजगाराचे दिवसेंदिवस घटते प्रमाण, प्रादेशिक विकासाचा असतोल, बदलत्या उत्पादन व्यवस्थेच्या दृष्टीने कौशल्यांचा अभाव अशी विविध कारणे दिसून येतात. बेरोजगारितेचे हे प्रमाण वंचित घटकांमध्ये अधिक उग्र रूप धारण करताना दिसून येते. समाजातील वंचित घटक विषम सामाजिक रचनेमुळे पूर्वीपासूनच साधन संपत्तीविहिनतेला बळी पडलेले असून नव्या आर्थिक व्यवस्थेतही त्यांच्या वाट्याला भौतिक वंचितता आलेली आहे, यावर उपाय म्हणून शासकीय पातळीवर धोरणात्मक बदलांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी.एच. किर्दक यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग व विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषद, ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय पंधराव्या राज्य अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात ‘बेरोजगारिता आणि वंचित घटकांच्या समस्या’ या विषयावर विषयतज्ज्ञ म्हणून त्यांनी मांडणी केली.
सत्राचे सूत्रसंचालन यवतमाळ येथील सावित्रीबाई जोतीराव समाजकार्य महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. सीमा शेट्टे यांनी, तर आभारप्रदर्शन खामगाव येथील स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. दयानंद राऊत यांनी केले. याप्रसंगी बहुसंख्य प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.