धारणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई! १२ गोवंश जनावरे कत्तलीपासून वाचवली
धारणी – धारणी शहरालगत असलेल्या मुस्लिम कब्रस्तानच्या मागच्या नाल्यात, झाडाझुडपांमध्ये ८ गाई आणि ४ बैल अशी एकूण १२ गोवंश जनावरे क्रूरपणे कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आली होती.
जनावरांच्या अंगावर ना चारा, ना पाणी – फक्त मृत्यूच्या प्रतीक्षेत तडफडणाऱ्या अवस्थेत ते आढळून आले. या अमानवी घटनेची माहिती ७ एप्रिलच्या सायंकाळी पोलीस विभागाला गुप्त सूत्रांद्वारे मिळाली.
तात्काळ कारवाई; निर्दयी दृश्य पाहून हेलावले मन
तत्काळ पंचासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पाहणी दरम्यान जनावरांची अत्यंत निर्दयी आणि क्लेशदायक अवस्था पाहून उपस्थित अधिकारी आणि पंच देखील सुन्न झाले.
कोणताही मालक पुढे न आल्याने जनावरांची सुटका
आजूबाजूच्या परिसरात विचारणा करूनही कोणताही मालक पुढे न आल्याने पोलिसांनी सर्व जनावरे ताब्यात घेतली. जवळपास ₹1,28,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व गोवंश जनावरे चाकरदा येथील गोरक्षण केंद्रात सुरक्षित हलवण्यात आले.
कठोर कायदेशीर कारवाई
या घटनेवरून महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, 5B, 9, 11 तसेच प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 11(3) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पोलिसांची तत्परता
ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशावरून, तसेच ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पो.उ.नि. सतीश झाल्टे, अनंत हंकारे, मोहित आकाशे, जगत तेलगोटे, साबुलाल दहीकर आणि सय्यद जावेद यांनी विशेष योगदान दिले.