नांदगाव पेठजवळ भीषण अपघात : ट्रक मधून उडालेल्या राखेमुळे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, संतप्त नागरिकांचा आरटीओ विरोधात आंदोलन
अमरावती — नांदगाव पेठ परिसरात मंगळवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. ट्रक मधून उडालेल्या राखेमुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतकाचे नाव ऋषिकेश सुभाष निंभोरकर (वय २७, रा. नांदुरा) असून तो अविवाहित होता आणि एटीएम सेवा विभागात कार्यरत होता.
अपघाताची घटना
ऋषिकेश दुचाकीवरून जात असताना, समोरून येणाऱ्या ट्रक मधून उडालेल्या राखेमुळे त्याच्या डोळ्यात राख गेली. त्यामुळे त्याचा वाहनावरचा ताबा सुटला आणि उलट दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली तो चेंगरला. घटनास्थळीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातानंतर घडलेल्या घडामोडी
राख वाहून नेणारा ट्रकचालक अपघातानंतर पसार झाला, तर ट्रॅक्टर आणि चालकाला नांदगाव पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत आंदोलन उभारले. आंदोलनकर्त्यांनी रतन इंडिया कंपनीवर आणि आरटीओ प्रशासनाच्या हलगर्जीपणावर ठपका ठेवला.
मागण्या आणि कारवाई
रोज राख वाहून नेणाऱ्या ट्रकमधून अशा प्रकारे उडणारी राख अनेक अपघातांना कारणीभूत ठरत आहे, तरीही प्रादेशिक परिवहन विभाग कारवाई करत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.
नांदगाव पेठजवळ आरटीओ पथकाने राख वाहून नेणाऱ्या ट्रकवर कारवाई करावी. मृतकाच्या कुटुंबीयांना रतन इंडिया कंपनीने आर्थिक मदत द्यावी. प्रहारचे वसू महाराज यांनी इशारा दिला की मागण्या मान्य न झाल्यास मृतदेह थेट आरटीओ कार्यालयात नेण्यात येईल.
प्रशासनाचा हस्तक्षेप आणि लेखी आश्वासन
प्रकरण गंभीर होताच आरटीओ अधिकारी निलेश दहिकर आणि पोलीस निरीक्षक अंभोरे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर प्रहार संघटनेचे वसू महाराज आणि नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.