महाराष्ट्रातील सर्वात मोठे ड्रग्ज प्रकरण; 35 जणांवर गुन्हे, 14 आरोपींना अटक, 21 आरोपी फरार, 80 जणांना नोटीस आणि…

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकट उघडकीस आले आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. गुन्हा घडल्या पाडुन 60 व्या दिवशी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. 10 हजार पानांचे हे दोषारोपपत्र आहे. दोषारोप पत्रात अनेक गंभीर मुद्द्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
तामलवाडी पोलिसांनी धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात तुळजापुरात ड्रग्ज तस्करी प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपीचे जवाब, घटनास्थळ, पंचनामा, सिडीआर या सह इतर बाबींचा दोषारोप पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई, सोलापूर, पुणे येथील ड्रग्ज कनेक्शन असल्याचा ही उल्लेख या दोषारोपत्रात करण्यात आला आहे.
तपास अधिकारी गोकूळ ठाकूर यांनी दोषारोपपत्र दाखल केले. दोषारोपपत्र सादर केल्याने सुनावणीला वेग येणार आहे. याप्रकरणात एकूण 35 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 14 आरोपींना अटक करण्यात आली. 21 आरोपी फरार आहेत. तर, 80 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.
तुळाजापुर तालुक्यातील तामलवाडी इथे 15 फेब्रुवारी रोजी ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला होता. तेव्हापासून ड्रग्ज तस्करीबाबत अनेक खुलासे समोर आलेत. याप्रकरणात पोलिसांनी ड्रग्ज पेडलर्सना अटक केली. त्यानंतर या ड्रग्ज विक्रिचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचली. मुंबईतून ड्रग्ज तस्करीप्रकरणी संगीता गोळे हिला अटक करण्यात आली. विशेष पथकांची नेमणूक करत पोलिसांकडून तपास केला जातोय. यात पुजा-यांचा सहभाग असल्याने खळबळ उडाली.