काश्मीरमधील पहेलगाम हल्ल्यानंतर अकोल्याचे ३१ पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले; मदतीसाठी राज्य सरकारकडे मागणी

अकोला – काश्मीरच्या पहेलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटनासाठी गेलेल्या अकोल्याच्या ३१ पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे सर्व पर्यटक १८ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान गुरुमाऊली टूर्सच्या माध्यमातून काश्मीर दौऱ्यावर गेले होते.
हल्ल्याच्या घटनेनंतर त्यांनी पुढील प्रवास तात्काळ थांबवला असून सध्या हे सर्व पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले आहेत. मात्र स्थानिक नागरिकांनी त्यांना अन्न, निवारा आणि आवश्यक त्या सुविधा पुरविल्याने सध्या ते सुरक्षित असल्याची माहिती पर्यटकांनी दिली आहे.
परंतु, या सर्वांची अकोल्यात लवकर परतण्याची धावपळ सुरू असून, मिळेल त्या मार्गाने घरी परतण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. त्यांनी राज्य सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली असून, त्यांच्या सुरक्षित व सुस्थितीत परताव्यासाठी लवकरात लवकर व्यवस्था करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
“सध्या आम्ही सर्वजण श्रीनगरमध्ये आहोत. लोकांनी मदत केल्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. पण लवकरात लवकर घरी पोहोचणे आवश्यक आहे. सरकारने आमच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा,” असे प्रत्यक्ष बोलताना काही पर्यटकांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी संबंधित यंत्रणांकडून पर्यटकांच्या सुरक्षेची माहिती घेतली जात आहे.