अयोध्या दर्शनघेत बिदरकडे जात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

यवतमाळ :अयोध्या दर्शन करून बिदरकडे परतणाऱ्या कर्नाटकातील भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक आग लागण्याची धक्कादायक घटना नागपूर–तुळजापूर महामार्गावरील चिल्ली घाटाजवळ घडली. काही क्षणांतच गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडून पूर्णतः जळून खाक झाली. मात्र, सुदैवाने सर्व प्रवाशांचे प्राण वाचले.
या टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये एकूण १५ भाविक प्रवास करत होते, त्यामध्ये १० पुरुष आणि ५ महिला यांचा समावेश आहे. आग लागताच प्रसंगावधान राखून सर्व प्रवासी गाडीतून बाहेर पडले आणि मोठा अनर्थ टळला.
घटनेनंतर त्या मार्गावरून जात असलेल्या यवतमाळच्या माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांनी तत्काळ उमरखेड अग्निशमन दलाला सूचना दिली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्याआधीच गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती.
या दुर्घटनेमुळे नागपूर–तुळजापूर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.