बोलायचं नसतं तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते! भारत-पाकिस्तान युद्धाबाबत शरद पवारांचं वक्तव्य

Sharad Pawar on Indian Pakistan War : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून दोन्ही देशांना संयम ठेवण्याचं आणि शांतता बाळगण्याचं आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
बारामतीत येथे शरद पवार यांना भारत-पाकिस्तान तणावावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून होणाऱ्या अपीलबद्दल विचारण्यात आलं. यावर “बोलायचं नसतं तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते.”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानकडून वारंवार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचे प्रयत्न केले जात आहेत. भारतानेही ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या कारवायांतून पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर दिलं आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचं वक्तव्य विशेष लक्षवेधी ठरत आहे.
शरद पवारांकडून केंद्र सरकारचं कौतुक
दरम्यान, ऑपरेशन ‘सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संवाद साधला होता. त्यांनी भारतीय सशस्त्र दलांच्या धाडसी कारवाईचं कौतुक केलं आणि त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांचं अभिनंदनही केलं. या कठीण काळात केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिल्याचंही त्यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केलं होतं.
भारताकडून पाकिस्तानचे हवाई तळं उद्ध्वस्त
शनिवारी सकाळी भारतीय वायूदलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करून मोठी कारवाई केली. या विमानांनी क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने तीन ते चार प्रमुख हवाई तळांवर अचूक हल्ले चढवले. विशेषतः रावळपिंडीजवळील नूर खान हवाई तळ हे मुख्य लक्ष्य होतं, तर मुरीद आणि सुकूर या तळांवरही जोरदार हल्ले करण्यात आले. या हवाई हल्ल्यांमुळे पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागलं असल्याची माहिती समोर येत आहे. भारताच्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या एअर डिफेन्स यंत्रणेला चकवा देत अत्यंत अचूकपणे लक्ष्यांवर आदळत जबरदस्त परिणाम साधला. ही कारवाई भारतासाठी एक मोठं यश मानली जात आहे.