राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार, आजपासून मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ 4 जिल्ह्यांना अलर्ट

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतायेत. गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण राज्यात पावसाने जोर धरला आहे. तसंच, पाऊस पडून गेल्यानंतर उकाडादेखील वाढला आहे. पावसात अवकाळी पावसामुळं शेतीचे अतोनात नुकसान झालं आहे. पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पुढील आठवडाभर राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तसंच हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढील 4-5 दिवस अवकाळी पाऊस होणार आहे. अनेक जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसाच्या या स्थितीमुळं महाराष्ट्रातदेखील मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे.
राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच यावेळी 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, असेही हवामान विभागाने सांगितले आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पुढील 2 दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात काही ठिकाणी पुढील चार पाच दिवस विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे.
पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वेळी काही भागांत गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 29 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूरला या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.