बडनेरा समता चौकातील बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सौंदर्यीकरण अर्धवट: समितीची तात्काळ कारवाईची मागणी
अमरावती (बडनेरा) : बडनेरा नवी वस्ती परिसरातील समता चौकात उभारण्यात आलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सौंदर्यीकरण गेल्या दीड वर्षांपासून अत्यंत मंदगतीने सुरू आहे. संबंधित एजन्सीने 14 एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याचा दावा केला होता. मात्र अद्यापही काम अपूर्ण असून, स्मारक परिसरातील अनेक बाबी धोकादायक अवस्थेत आहेत, अशी माहिती स्मारक समितीने दिली आहे.
विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर बसवण्यात आलेली छत्री ही अपूर्ण असून, ती केव्हाही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळा जवळ आल्यामुळे वादळी वाऱ्याच्या तडाख्याने छत्री कोसळल्यास पुतळ्याचे नुकसान होऊ शकते. ही बाब संबंधित यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिली असतानाही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
स्मारक समितीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे की, छत्रीच्या पायाभागाचे तातडीने काँक्रिटीकरण करावे, स्मारक परिसरातील शोभिवंत फुलझाडांचे गुराढोरांपासून रक्षण करण्यासाठी कंपाऊंडला गेट बसवावे आणि तातडीने विद्युत मीटरचीही व्यवस्था करावी. स्मारकाच्या सौंदर्यीकरणासाठी लागणारी ही मूलभूत कामे दीड वर्षांनंतरही प्रलंबित राहिल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्मारक समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर आंबेडकर पुतळ्याला कोणतेही नुकसान झाले तर समाजात तीव्र संताप उसळण्याची शक्यता असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या कामाकडे गांभीर्याने पाहून तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रतिनिधि – मच्छिंद्र भटकर, बडनेरा