अमरावती नियोजन भवनात जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांचा निरोप समारंभ संपन्न.
अमरावती: जिल्ह्याचे लोकप्रिय आणि कार्यक्षम जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. बुधवारी नियोजन भवन येथे आयोजित भावनिक निरोप समारंभात शेकडो अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला.
सौरभ कटीयार यांनी 2023 मध्ये अमरावती जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. गेली दोन वर्षे त्यांनी जिल्ह्यात अतिशय प्रभावी कामगिरी केली. विशेषतः विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचे यशस्वी नेतृत्व, प्रशासनातील पारदर्शकता आणि लोकाभिमुख निर्णय यामुळे ते जनतेच्या आणि सहकाऱ्यांच्या विशेष पसंतीस उतरले.
भावनिक निरोप समारंभ…
नियोजन भवनात आयोजित निरोप समारंभात सौरभ कटीयार यांचा जीवनप्रवास आणि प्रशासकीय वाटचाल स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आली. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली:
अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा
महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे
पोलीस उपायुक्त गणेश शिंदे व सागर पाटील
पद्मश्री शंकरबाबा पापळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिकार्यांचे मनोगत आणि पुष्पगुच्छांनी स्वागत
कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले. यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी आपल्या मनोगतात सौरभ कटीयार यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. अनेक कर्मचारी संघटनांच्या अध्यक्षा व प्रतिनिधींनीही आपली भावना व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सर्व मान्यवरांनी जिल्हाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देत सन्मानपूर्वक निरोप दिला.