खोलापूरमध्ये पहिल्याच पावसात ग्रामपंचायतीची पोलखोल – मुख्य चौकात चिखल आणि तुंबलेले नाले

भातकुली – खोलापूर येथील मुख्य चौकातील रस्ता पहिल्याच पावसात चिखलमय झाला आहे, आणि नाल्याची योग्य सफाई न झाल्याने सांडपाणी थेट व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांमध्ये शिरल्याने परिसरात प्रचंड अस्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त
मंगळवारी रात्री मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार मारा झाला. मात्र, मुख्य चौकातील नाल्यांमध्ये तुंबलेल्या घाण पाण्यामुळे संपूर्ण रस्ता गुडघाभर पाण्याने भरला. नागरिकांना या पाण्यातून मार्गक्रमण करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली.
स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनावर वेळेपूर्वी उपाययोजना न केल्याचा आरोप केला आहे. “जर वेळेवर नाल्यांची साफसफाई केली असती, तर व्यापाऱ्यांचे नुकसान टळले असते,” असा संताप व्यक्त करण्यात आला.
वार्ड क्रमांक १ – भूमिपूजन ते प्रत्यक्ष कामाचा खोळंबा
गेल्या काही महिन्यांपूर्वीच खासदार व आमदारांच्या हस्ते वार्ड क्रमांक १ मधील सिमेंट काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन झाले होते, मात्र प्रत्यक्षात त्या कामाला कोणतीही गती मिळालेली नाही. परिणामी, रस्त्याची अवस्था जैसे थेच असून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नागरिकांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
स्थानीय लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी
पावसाळा आता सुरू होत आहे, आणि पुढील दिवसांत अजून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून रस्ता व नाल्यांची योग्य देखभाल करण्याची मागणी केली आहे.