पातूरमध्ये वादळी वाऱ्याचा कहर! शेतकरी विजय गाडगे यांच्या लिंबू बागेचे मोठे नुकसान

अकोला : अकोला जिल्ह्यातील पातूर परिसरात काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची मोठी हानी केली आहे. या नैसर्गिक आपत्तीत पातूर येथील शेतकरी विजय गाडगे यांच्या दोन एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या लिंबूच्या 300 झाडांपैकी तब्बल 225 झाडे उखडून पडली आहेत.
गेल्या सात वर्षांपासून जपलेल्या या लिंबू बागेवर काही क्षणांतच निसर्गाने घाला घातल्याने विजय गाडगे यांच्या आर्थिक गणितावर मोठा परिणाम झाला आहे. उखडलेली झाडं पाहून गहिवरलेल्या शेतकऱ्याने कृषी विभागाकडे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची विनंती केली आहे.
विजय गाडगे यांनी सांगितले की, “झाडं पुन्हा लावली तरी त्यातून उत्पन्न येण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागेल. तोपर्यंत उत्पन्नाचा स्त्रोत बंद होणार असल्याने कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे.”
पातूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी देखील या पावसामुळे भुईमुग, मका, ज्वारीसह फळबागांचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.
प्रशासनाने तातडीने मदत करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासावर मोठा आघात होईल, अशी मागणी स्थानिक शेतकरी संघटनांनी केली आहे.
प्रतिनिधी : मुकेश ढोके