अकोला जिल्ह्यात दोन दिवसांच्या अवकाळी पावसाचा कहर: 3,076 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, २२ घरांची हानी
अकोला : अकोला जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवार अशा सलग दोन दिवस झालेल्या ढगफुटीसदृष्य अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत केलं आहे. या मुसळधार पावसामुळे तब्बल 3,076 हेक्टरवरील उन्हाळी व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, २२ घरांचे अंशतः नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुरू झालेल्या पावसात सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट होता. त्या दिवशी सरासरी ४८.२ मिमी पावसाची नोंद झाली. तर दोन दिवसांत मिळून सुमारे १०० मिमी पावसाचं प्रमाण नोंदवण्यात आलं आहे.
यावर्षी आधीच खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली होती. आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली उन्हाळी पिके आणि बागायती फळपीकेही उध्वस्त झाली आहेत. या अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अक्षरशः उघड्यावर आले असून शासनाकडून तत्काळ पंचनामे करून मदत मिळावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
एकंदरीत, शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटांची मालिका खंडित होताना दिसत नाही. संकटाने कूसही बदलायला वेळ देत नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रतिनिधी – मुकेश ढोके