पिपरी पूर्णा येथील अंगणवाडी झाली खाजगी नागरिकांची मतेदारी, ग्रामपंचायत प्रशासन व अंगणवाडी सेविकांचे दुर्लक्ष

पिपरी पूर्णा – अंगणवाडी हे जिथे चिमुकल्या बालकांचे पोषण, आरोग्य आणि शिक्षण दिलं जातं, त्या ठिकाणीच खाजगी बांधकामाचं साहित्य टाकून त्यांच्या आरोग्यावर गदा आणण्याचा प्रकार समोर आला आहे.
येथील रहिवासी विष्णू कुरवाडे यांनी आपल्या घराच्या बांधकामासाठी लागणारे लोहा, गिट्टी, रेती इत्यादी साहित्य थेट अंगणवाडीमध्ये साठवले आहे, ज्यामुळे लहानग्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार, संपूर्ण बांधकाम साहित्य धुळीने भरलेलं असून मुलांचे खेळणे, बसणे अशक्य झाले आहे. धुळीमुळे श्वसनाचे आजार होण्याचीही शक्यता आहे. विशेष म्हणजे, ही बाब प्रशासनाच्या लक्षात असूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही, हे अधिक चिंताजनक आहे.
ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका, आणि प्रशासकीय अधिकारी यांचं दुर्लक्ष ही गावकऱ्यांच्या संतापाची कारणीभूत ठरत आहे. ग्रामस्थांनी तत्काळ बांधकाम साहित्य अंगणवाडीतून हटवून परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली आहे.
“खाजगी व्यक्तीच्या दबावापोटी सार्वजनिक जागा अडवणे ही लोकशाही व्यवस्थेची थट्टा आहे,” असे नागरिक म्हणत आहेत. अंगणवाडीच्या सेवांवर परिणाम होतो आहे, आणि लहानग्यांचं आरोग्य धोक्यात आहे – प्रशासन झोपेत आहे का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.