LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

महाराष्ट्र आणि मलेशिया दरम्यान व्यापार वृद्धीसाठी एकत्रित प्रयत्न करणार – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई : भारत नुकतीच जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. या आर्थिक प्रगतीत महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा असून भारताच्या एकूण जीडीपीपैकी महाराष्ट्राचे योगदान सुमारे 15 टक्के आहे. मागील दशकात भारतात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकींपैकी 30 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. राज्य निर्यात सक्षमतेबाबत देशात क्रमांक एकवर आहे. मलेशिया आणि भारतातील आर्थिक आणि व्यावसायिक संबंध वृद्धींगत करण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करुया, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

महाराष्ट्र आणि मलेशिया दरम्यान द्विपक्षीय व्यापारातील अधिक संधी आणि शक्यता शोधण्यासाठी सह्यादी अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मलेशियाचे महा वाणिज्यदूत झुवारी युसोफ आणि इंडो-मलेशिया ट्रेड अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र विविध क्षेत्रात करीत असलेल्या प्रगतीबाबत माहिती देऊन राज्यात 306 औद्यगिक विकास क्षेत्रे, 50 हजार पेक्षा अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि 20 हून अधिक औद्योगिक कॉरिडॉर्स असल्याचे राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, मुंबईत विविध देशांचे 100 पेक्षा अधिक दूतावास तसेच अनेक आंतरराष्ट्रीय वाणिज्य मंडळे आहेत. भारत आणि त्यातही महाराष्ट्र विविध क्षेत्रात करीत असलेली प्रगती तसेच द्विपक्षीय व्यापार व संबंधांच्या वाढीसाठी मिळत असणारी संधी अनेक देशांना मुंबईत दूतावास स्थापन करण्यासाठी आकर्षित करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यात कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून आंबा, केळी, कांदा, डाळींब, द्राक्ष आदींची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. महाराष्ट्र आणि मलेशियामधील व्यापाराच्या संधींच्या अनुषंगाने यावेळी महाराष्ट्र आणि मलेशियाच्या वतीने सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. मलेशिया सेमी कंडक्टर क्षेत्रात आघाडी घेत असून त्याबाबतच्या व्यापाराच्या संधी शोधण्यासाठी महाराष्ट्राचे उद्योगविषयक शिष्टमंडळ मलेशियाला भेट देईल, असे श्री.रावल यांनी यावेळी सांगितले. व्यापार वृद्धीच्या संधींसाठी मलेशियाच्या शिष्टमंडळाने देखील महाराष्ट्रात भेट देण्याचे निमंत्रण त्यांनी दिले. या बैठकीतील चर्चा फलदायी ठरेल, असा विश्वास श्री.रावल यांनी यावेळी व्यक्त केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!