अचलपूर तहसीलमध्ये दाखल्यांसाठी नागरिक त्रस्त
अचलपूर : अचलपूर तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले दाखले मिळवण्यासाठी रोज तहसील कार्यालयाचे चक्कर मारावे लागत आहेत. विशेष म्हणजे सेतू कार्यालयाची सेवा दुपारी बारा वाजता आधीच बंद केली जात असल्यामुळे शेकडो नागरिकांना अपूर्ण कामासह परतावे लागते.
विद्यार्थ्यांचे भविष्य दावणीला
अचलपूर परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल प्रमाणपत्र आदी विविध दाखल्यांची आवश्यकता असते. मात्र हे सर्व मिळवण्यासाठी त्यांना दिवसभर तहसील कार्यालयात रांगा लावाव्या लागतात, परिणामी अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत.
रोजगार मजुरांचे हाल
शासनाच्या योजना, शैक्षणिक प्रवेश किंवा कर्ज प्रक्रियेसाठी दाखले घेणे आवश्यक असते. मात्र दिवसभर मजुरी करणाऱ्या लोकांना आपले काम सोडून तहसीलचे फेरे मारावे लागत आहेत. वेळेवर सेवा न मिळाल्याने त्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे.
सेतू कार्यालय वेळा आणि सेवा – नागरिकांत नाराजी
सेतू कार्यालय बारा वाजण्यापूर्वीच बंद होत असल्याचे अनेक तक्रारी सिटी न्यूजकडे दाखल झाल्या आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, “सकाळी आले तरी तांत्रिक अडचणींमुळे काम होत नाही, आणि दुपारी वेळेआधीच ऑफिस बंद.” त्यामुळेच तहसील कार्यालयाच्या कामकाजावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
सेतू व्यवस्थापक संदीप लिखितकर यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की,
“नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच प्रणालीत सुधारणा करण्यात येईल.”
तहसीलदार डॉ. संजय घरकल यांनीही यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“तहसील कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे समाधान होईल, यासाठी लवकरच अधिक प्रभावी व्यवस्था राबवण्यात येणार आहे.”
- मुख्य मुद्दे –
दाखल्यांसाठी शेतकरी, मजूर, विद्यार्थी त्रस्त - सेतू कार्यालय दुपारी लवकर बंद – सेवा अपुरी
- शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत अडचणी
- कामगार वर्गाला काम सोडून तहसील फेरे
- अधिकाऱ्यांकडून सुधारण्याचे आश्वासन