जन्मप्रमाणपत्राचा हिशोब घेण्यासाठी कितीही धमक्या आल्या तरी घाबरणार नाही! – अमरावतीत किरीट सोमय्या यांची ठाम भूमिका

अमरावती : बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अमरावती मनपाने दिलेल्या जन्मप्रमाणपत्रांची सखोल चौकशी सुरू असून, याच संदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शुक्रवारी अमरावतीत मनपा आयुक्त कार्यालयात बैठक घेतली.
या बैठकीत सुमारे दीड तासांहून अधिक कालावधी चर्चा झाली. सोमय्या यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“जन्मप्रमाणपत्राचा हिशोब घेण्यासाठी कितीही धमक्या आल्या, तरी मी घाबरणार नाही. हे काम थांबवणार नाही.”
1990 जन्मप्रमाणपत्रांची चौकशी:
किरीट सोमय्या यांच्या मागणीवरून अमरावती महापालिकेने यापूर्वी 1990 संशयित जन्मप्रमाणपत्रांची चौकशी सुरू केली होती. यामध्ये 100% काम पूर्ण झाले असून, चुकीचे असल्याचे आढळलेल्या प्रमाणपत्रांना रद्द करण्यात आले आहे, असे सोमय्या यांनी सांगितले.
1708 जण आले, 490 जण गायब – गंभीर सवाल:
अर्ज करून देखील 2190 व्यक्तींपैकी केवळ 1708 जणच महापालिकेत आले होते, तर 490 लोक हजर झाले नाहीत.
“हे उर्वरित 490 जण कोण आहेत? ते का आले नाहीत? त्यांचे जन्मप्रमाणपत्र खरे आहेत का?” असा थेट सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला.
महसूल विभागाचा बहिष्कार?
बैठकीला महसूल विभाग उपस्थित नव्हता, याबाबत प्रश्न विचारला असता, एका पत्रकाराला उत्तर देताना सोमय्या म्हणाले,
“तुमचा टोन खाली करा. हे माझं काम नाही. मी माझं काम करत राहणार.”
महापालिका टीमचे कौतुक:
काम पूर्णपणे पार पाडल्याबद्दल सोमय्या यांनी महापालिका प्रशासनाचे आणि तपास करणाऱ्या टीमचे आभार मानले.
अमरावती जिल्हा व मनपा हद्दीत बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा तपास सुरू:
या प्रकरणाची व्याप्ती फक्त मनपा मर्यादेत न राहता जिल्हाभरात आहे, आणि या संदर्भात अजूनही तपास सुरू असल्याची माहितीही यावेळी समोर आली.