नागपूरात 7 ते 9 जून दरम्यान भव्य ‘पाणी परिषद’; मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी, पद्मश्री चैत्राम पवार यांची उपस्थिती

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने 7 ते 9 जून दरम्यान नागपूर येथे तीन दिवसीय ‘पाणी परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत विदर्भातील पाणी प्रश्नांवर सखोल चर्चा आणि उपाययोजना यावर मंथन होणार आहे.
या परिषदेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यासोबतच समारोप सत्रात पद्मश्री पुरस्कार प्राप्त जलदूत चैत्राम पवार व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे.
या परिषदेत पेयजल परिषद, कृषी जलपरिषद व औद्योगिक जलपरिषद अशा तीन प्रमुख सत्रांद्वारे विविध क्षेत्रांतील जलविषयक प्रश्नांवर विचारमंथन होईल.
विशेष म्हणजे, या उपक्रमात विदर्भातील हजारो शेतकरी, जलतज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था, जलसंधारण कार्यकर्ते तसेच अभ्यासक मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. पाण्याच्या टिकवू वापरासाठी नवे मार्ग, धोरणात्मक दृष्टिकोन आणि तांत्रिक उपाय यावर मार्गदर्शन दिलं जाणार आहे.
पाणी परिषदेमुळे विदर्भातील जलसंकटावर एकात्मिक उपाययोजना करण्याची दिशा निश्चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.