महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, पण ‘या’ जिल्ह्याला मात्र यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : 15 दिवस लवकर आलेल्या मान्सूनचा जोर आता ओसरणार आहे. मान्सूनचे प्रवाह कमजोर झाल्याने पाऊस ओसरण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे. तर, एकीकडे विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले असून बांगलादेशातील ढाक्यापासून वायव्येकडे 110 किमी उंचीवर आहे. ईशान्येकडे सरकत असलेली ही प्रणाली निवळू लागल्याने दुपारी ही प्रणाली बांगलादेशातील सागर बेटे आणि खेपूपाराजवळ जमिनीवर आली आहे. याची तीव्रता हळूहळू ओसरणार आहे. त्यामुळं पावसाचा जोर कमीच राहणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
आज 31 मे रोजी विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह विजाच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच, यलो अलर्टदेखील देण्यात आला आहे. तर, उर्वरित राज्यात मुखतः पावसाच्या उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामन विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पावसाच्या प्रगतीसाठी पोषक स्थिती नाही. यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहील. मात्र 12 जूननंतर संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय होईल. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.
पावसामुळं शेतकऱ्यांचे नुकसान
मान्सूनपूर्व झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कुणालाही अंदाज नसताना मे महिन्यातच जास्त पाऊस झाल्यामुळे काढणीला आलेल्या अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तलुक्यातही या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. मुस्तपूर सायन्ना मंडेवाड यांनी दोन एकर शेतात भूईमुगाची लागवड केली होती. अवघ्या दोन चार दिवसात भुईमूग काढले जाणार होते. मात्र बिलोली तालुक्यात जोरदार मुसळधार पाऊस झाला. जास्त पाऊस झाल्याने जमिनीत पाणी मुरून भुईमूगाच्या शेंगाणा कोंब फुटले. त्यामुळे शेतकऱ्याचे अपेक्षित उत्पन्न येणार नसून आर्थिक फटका बसणार आहे. शेताचा पंचनामा करून मदत करावी अशी विनंती या बाधित शेतकऱ्याने केलीये.