मी भाजप सोडलं नाही, मला राष्ट्रवादीत पाठवण्यात आलं! – आमदार प्रताप पाटील चिखलीकर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप सोडण्याच्या निर्णयावरून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मी स्वतःहून भाजप सोडलेलं नाही, तर पक्षांतर्गत एड्जस्टमेंटसाठी देवेंद्र फडणवीस यांनीच मला राष्ट्रवादीत पाठवलं,” असा स्पष्ट खुलासा त्यांनी केला आहे.
भाजपच्या एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात चिखलीकर यांनी 2019 लोकसभा निवडणुकीतील घटनांचा संदर्भ देत अशोक चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला. “अशोकराव हे लीडर नाहीत, डीलर आहेत, असं विधान खुद्द मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. जिल्ह्याला खऱ्या अर्थाने लीडर चिखलीकरच्या रूपाने दिला जातोय, असंही त्यांनी तेव्हा म्हटलं होतं,” असं सांगत चिखलीकर यांनी भाजप नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या भाषणादरम्यान त्यांनी माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्या पक्षप्रवेशावरही टिप्पणी केली. भाजपच्या एका सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत डी. पी. सावंत यांचा फेरप्रवेश झाला होता. त्यावर चिखलीकर म्हणाले, “अशोक चव्हाणांचे जवळचे मित्र असलेले सावंत भाजपमध्ये प्रवेश करतात, आणि अशोक चव्हाण त्याचे समर्थन करतात — याला काय म्हणायचं?”