जागेच्या वादातून महिलेवर हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

अकोला : अकोल्याच्या पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथे जागेच्या वादातून मध्यस्थी करण्यास गेलेल्या एका महिलेवर सहा जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वनिता गवई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संतप्त भावना असून, मृतक महिलेच्या पतीने आत्महत्येचा इशारा दिल्याने पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे.
घटना बुधवार दिनांक 28 मे रोजी दुपारी घडली. दिग्रस बु. येथे दोन गटांमध्ये जमिनीच्या वादावरून सुरू असलेली वादावादी मिटवण्यासाठी वनिता गवई या मध्यस्थ म्हणून गेल्या होत्या. मात्र, वाद शांत करण्याऐवजी तिला आणि तिच्या पती अभिमन्यू गवई यांना मारहाण करण्यात आली.
जखमी वनिता गवई यांना अकोल्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यासंदर्भात अभिमन्यू गवई आणि ग्रामस्थांनी चान्नी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संबंधित सहा जणांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.
अभिमन्यू गवई यांचे भावनिक निवेदन:
“माझ्या पत्नीचा निष्पाप मृत्यू झाला आहे. अजूनही आरोपी मोकाट फिरत आहेत. जर मला आणि माझ्या मुलांना न्याय मिळाला नाही, तर आम्ही एकत्र आत्महत्या करू.”
गावातील नागरिकांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला असून, पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
पोलीस तपास सुरू असून, घटनास्थळाच्या साक्षी व पुरावे संकलनाचे काम सुरू आहे.