मूर्तिजापूरमध्ये बोलेरो गाडी थांबवून दोन युवकांवर तलवारीने प्राणघातक हल्ला

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुक्यातील आसरा फाट्याजवळ २९ मे रोजी पहाटेच्या सुमारास दोन युवकांवर तलवार व लोखंडी पाइपने प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
प्राप्त माहितीनुसार, सय्यद वहाब सय्यद मोहम्मद अली (वय २६, रा. जुनी वस्ती) यांनी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार ते व त्यांचे मित्र मोहम्मद अरबाज मोहम्मद नासिर (रा. खडकपुरा) हे बोलेरो वाहनातून गुरे घेऊन जात होते.
दरम्यान, आसरा फाट्याजवळ एमएच-११-सीटी-७७७७ क्रमांकाच्या वाहनातून आलेल्या काही व्यक्तींनी त्यांच्या गाडीला अडवले आणि तलवार व लोखंडी पाइपने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
या प्रकरणात आदित्य महाजन व पवन गुंजाळ यांची नावे पुढे आली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. हल्ला केल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे करत आहेत. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस तपासाद्वारेच पुढील माहिती समोर येणार आहे.