गाव पातळीवर विकसित कृषी संकल्प अभियान
अमरावती : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने दि . २९ मे पासून देशभरात एकाच वेळी विकसित कृषी संकल्प अभियान केंद्र शासनातर्फे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत नुकतेच वरुड तालुक्यातील लोणी, बेनोडा व जरुड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मृदा सर्वेक्षण विभाग, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्यातर्फे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. ओ. शिराळे तसेच कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर येथील कृषी विस्तार तज्ज्ञ डॉ. प्रताप जायले, डॉ. महेश आखूड, राहुल घोगरे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात शेतकऱ्यांना जैविक शेतीचे महत्त्व, माती परीक्षण, बीज प्रक्रिया, जैविक खते व कीडनाशकांचा संतुलित वापर, एकात्मिक कीड व्यवस्थापन, उत्पन्न वाढीसाठी एकात्मिक पीक व्यवस्थापन, शासनाच्या विविध योजना, पशुसंवर्धन कृषी तंत्रज्ञान, ड्रोन प्रात्यक्षिक, बियाणे क्षमता प्रात्यक्षिक आदी अनेक विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
माहिती देताना डॉ. शिराळे यांनी मातीचा जिवंतपणा कसा टिकून ठेवावा, माती परीक्षण करणे का गरजेचे आहे, मातीचा नमुना कसा घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले.
डॉ. जायले यांनी रासायनिक खतांचा सुयोग्य वापर, जैविक खतांची गरज यावर माहिती दिली.
कार्यक्रम सहायक राहुल घोगरे यांनी शेतकऱ्यांनी अन्न प्रक्रिया व मूल्यवर्धन या बाबींकडे वळणे गरजेचे असल्याचे सांगितले.
पशुसंवर्धन विभागाचे डॉ. आखूड यांनी शेती करताना जोड व्यवसाय करणे ही आज काळाची गरज असल्याचे सांगून पशुपालन करताना शासनाच्या विविध योजना याविषयी त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रतापराव जायले यांनी केले. सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक लक्ष्मीकांत श्रीराव यांनी तर कृषी सहायक स्नेहा म्हैसणे यांनी आभार मानले.