LIVE STREAM

AmravatiLatest News

निष्ठावान कर्मचा-यांमुळे विद्यापीठ गतिशील – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते

अमरावती – आपल्या मातृसंस्थेप्रती कर्मचा-यांचे प्रेम, निष्ठा, यामुळेच विद्यापीठ गतिशील आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी.डब्ल्यू. निचित, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, नियंत्रण अधिकारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, उपकुलसचिव श्री राहुल नरवाडे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, सत्कारमूर्ती सौ. सुनिता मंगरुळकर, श्री मंगरुळकर, श्री विट्ठलराव मरापे, सौ. मरापे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते.
कुलगुरू पुढे म्हणाले, विद्यापीठाच्या विकासामध्ये सर्व कर्मचा-यांचा सिंहाचा वाटा आहे. कर्मचारीच विद्यापीठाचे आधारस्तंभ आहेत, पुढेही असेच प्रेम, निष्ठा कायम राहील असे सांगून सेवानिवृत्त कर्मचा-यांना त्यांनी निरामय आरोग्याच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी श्री मंगरुळकर तसेच सौ. मंगरुळकर, श्री व्ही.के. मरापे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरवप्रमाणपत्र देऊन, तर सौ. मंगरुळकर यांचा सौ. अनुपमा देशमुख, सौ. मरापे यांचा सौ. पुनम जाधव यांनी साडीचोळी, कुंकवाचा करंडा देऊन सत्कार केला.
प्रमुख अतिथी डॉ. डी. डब्ल्यू. निचित म्हणाले, विद्यापीठाचे कर्मचारी निष्ठेने काम करतात. कामाप्रती ते एकनिष्ठ आहेत, असे सांगून त्यांनी सत्कारमूर्तींना पुढील भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सत्कारमूर्ती सौ. मंगरुळकर मनोगत व्यक्त करतांंना म्हणाल्या, मातृसंस्थेतून निवृत्त होतांना मन हळवं होतं. मातृसंस्था, समाजाला आपलं काही देणं लागतं, त्याचं समाधानही आहे व सेवाकाळातील सुखद आठवणी कायम स्मरणात राहतील. श्री विट्ठलराव मरापे म्हणाले, सेवाकाळात सहकारी कर्मचा-यांचे भरभरुन प्रेम मिळाले. विद्यापीठ एक कुटुंबच आहे. विद्यापीठाचे ऋण कधीही फेडता येणार नाही. नियंत्रण अधिकारी डॉ. नितीन कोळी, उपकुलसचिव श्री राहुल नरवाडे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख यांनीही मनोगतातून सत्कारमूर्ती सौ. सुनिता मंगरुळकर तसेच श्री विट्ठलराव मरापे यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने उपाध्यक्ष डॉ. अविनाश असनारे, कोषाध्यक्ष श्री राजेश एडले, मानद सचिव श्री श्रीकांत तायडे, संचालक डॉ. नितीन कोळी यांनी सत्कारमूर्ती सौ. सुनिता मंगरुळकर व श्री विट्ठलराव मरापे यांचा भागभांडवलाचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, संचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी, तर आभार अधीक्षक श्री धनंजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणीचे सदस्य, विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच सत्कारमूर्तींच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!