अमरावतीच्या श्री शंकर मंदिरात ‘पंचरत्न’ वृक्षारोपण; पर्यावरण दिनी अनोखी श्रद्धा व संवेदनशीलतेचा संगम

अमरावती : राहटगाव जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने राहटगाव येथील श्री शंकर मंदिर संस्थानच्या वतीने पर्यावरण रक्षणाचा एक वेगळा आदर्श उभा करण्यात आला. मंदिर प्रांगणात वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब आणि चंदन या पाच पवित्र व औषधी वृक्षांची “पंचरत्न” म्हणून विधीपूर्वक पूजा करून वृक्षारोपण करण्यात आले.
“ही पंचप्राण वृक्षं आहेत” — माजी खासदार अनंतराव गुढे
या वेळी उपस्थित माजी खासदार व मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री अनंतराव गुढे यांनी सांगितले की, “वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब व चंदन हे वृक्ष मानवाच्या आरोग्यासाठी व पर्यावरण समतोलासाठी अत्यंत आवश्यक असून, यांची लागवड ही केवळ सामाजिक नाही तर आध्यात्मिक जबाबदारी आहे.”
ते पुढे म्हणाले की, रस्ते रुंदीकरण, डोंगर खोदकाम यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. त्यामुळे अशा औषधी आणि पवित्र वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन अत्यावश्यक बनले आहे.
संस्थेचा पुढाकार, वृक्षसंवर्धनासाठी संरक्षण भिंत
मंदिर संस्थेने मागील वर्षी अमरावती महानगरपालिका आणि संस्थेच्या संयुक्त सहकार्याने लावलेल्या झाडांचे पूर्ण संगोपन यशस्वीरित्या केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच यावर्षी लावण्यात आलेल्या वृक्षांची निगा राखण्यासाठी खास संरक्षण भिंतीचे बांधकामही करण्यात आले आहे, जेणेकरून जनावरांकडून कोणतीही हानी होणार नाही.
उपस्थित मान्यवर आणि सेवेकरी वृक्षसंवर्धनासाठी कटिबद्ध
या कार्यात श्री कैलास गिलोरकर (कोषाध्यक्ष), श्री अभिमान डोईजड, निलेश डाके, श्री अभिजीत गुढे, व्यवस्थापक श्री सुभाष चौधरी, श्री अमर राजपूत, पुजारी श्री अशोक महाराज नेवारे आणि झाडांची देखभाल करणारे सेवक श्री ध्यानेश्वर यांचा सक्रिय सहभाग होता.
भाविकांसाठी विशेष आवाहन
संस्थेने सर्व भाविक भक्तांना आवाहन केले आहे की, “ज्यांच्याकडे वड, पिंपळ, कडुलिंब, उंबर किंवा चंदन अशी पवित्र झाडे असतील, त्यांनी ती संस्थेला द्यावीत. संस्थेच्या वतीने त्या झाडांचे योग्य ठिकाणी वृक्षारोपण व संगोपन करण्यात येईल.