अर्धापूर नगरपंचायतीची कारवाई: नाल्यांवरील अतिक्रमणावर जेसीबी चालवली, व्यापाऱ्यांना अंतिम इशारा
अर्धापूर : अर्धापूर शहरात नाल्यांवर केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणावर आज नगरपंचायत प्रशासनाने धडक कारवाई केली. मुख्य रस्त्यालगत अनेक दुकानदारांनी नालीवर व्यापारी साहित्य ठेवल्यामुळे सार्वजनिक वाहतूक आणि जलवाहिनी व्यवस्था अडथळ्यात आली होती. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या वतीने आज सकाळपासून अतिक्रमण काढण्याची मोहिम सुरू करण्यात आली.
नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश फडसे यांनी स्पष्ट इशारा दिला की, “दुकानदार व व्यापाऱ्यांनी नाल्यांवरील अतिक्रमण स्वखुशीने काढावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता नगरपंचायतीच्या जेसीबीने ती निष्कासित करण्यात येईल. संबंधित अतिक्रमण धारकांवर दंडात्मक कारवाईसह कर लावण्यात येईल.”
श्री. फडसे यांनी पुढे सांगितले की, “या अतिक्रमणामुळे नागरिकांना होणारा त्रास, नाल्यांची गाळाने भरलेली अवस्था आणि पावसाळ्यातील जलभराव या सगळ्याचा विचार करून कठोर निर्णय घेणे गरजेचे होते.”
त्याचबरोबर, आठवडी बाजाराबाबतही निर्देश देण्यात आले. दर शुक्रवारी तलावाजवळील जागा बाजारासाठी निश्चित करण्यात आली असून, रस्त्यावर कोणत्याही परिस्थितीत बाजार भरविण्याची परवानगी दिली जाणार नाही. विशेषतः फळ विक्रेत्यांनी मुख्य रस्त्यावर गाडे लावल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या कारवाईदरम्यान नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरपंचायतचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.