LIVE STREAM

AmravatiLatest News

क्रांतीकारी बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त नवजागरण स्मरण समितीकडून आदरांजली

अमरावती – नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समिती, अमरावतीतर्फे महान आदिवासी क्रांतीकारी बिरसा मुंडा यांच्या शहादत दिनानिमित्त महावीर नगर येथील समिती कार्यालयात सकाळी 10 वाजता अभिवादन व स्मरण सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी समितीतील वक्त्यांनी त्यांच्या क्रांतीकारी जीवनावर प्रकाश टाकत, आजच्या काळात बिरसा मुंडा यांना आठवण्याचा योग्य अर्थ काय असावा, हे उपस्थितांसमोर मांडले.

बिरसा मुंडा – संघर्षाचा जाज्वल्य दीप
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक नायकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यात आदिवासींचा लढा फारच मोठा आहे. १८५५ सालीच झारखंडातील साहेबगंज जिल्ह्यात सिद्धू-कान्हू यांनी “करो या मरो, इंग्रज हमारी माटी छोड़ो” असा नारा देत इंग्रजांविरोधात लढा उभारला होता. याच परंपरेत १५ नोव्हेंबर १८७५ रोजी बिरसा मुंडा यांचा जन्म झाला.

बिरसा मुंडा हे बालवयातच प्रखर बुद्धिमत्ता आणि सामाजिक जाणिवांनी प्रेरित होते. शिक्षणासाठी त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, पण शोषण व अन्यायाचे वास्तव समजल्यावर त्यांनी त्याविरुद्ध बंड पुकारले. त्यांनी सांगितले – “साहेब-साहेब एक टोपी”, आणि मिशनच्या फायद्यासाठी वापरणाऱ्या सत्तेला तोंड दिले.

उलगुलान – आदिवासी सन्मानाची लढाई
बिरसा मुंडा यांनी जल-जंगल-जमीन, नारी सन्मान, आणि संस्कृती रक्षण यासाठी ‘उलगुलान’ (विद्रोह) सुरू केला. १८९४ मध्ये त्यांनी आदिवासींना एकत्र करून जमीन महसूल माफ करण्यासाठी आंदोलन छेडले. नंतर त्यांना हजारीबाग कारागृहात २ वर्षे कारावास झाला.

बाहेर आल्यानंतर त्यांनी अधिक तीव्रतेने इंग्रजांविरुद्ध लढा दिला. १८९७ ते १९०० दरम्यान त्यांनी ४०० सहकाऱ्यांसह पोलिस ठाण्यांवर हल्ले केले. जंगलात त्यांनी कमान-तिरांसारखी पारंपरिक शस्त्रे वापरत लढा दिला.

परंतु ४ फेब्रुवारी १९०० रोजी एका गुप्त माहितीच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली. ९ जून १९०० रोजी जेलमध्ये त्यांना विष दिल्याची शक्यता असून अधिकृतदृष्ट्या त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले.

बिरसाचा वारसा आजही जिवंत
बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखालील लढ्यामुळे १९०८ मध्ये ‘CNT कायदा’ अस्तित्वात आला ज्यामुळे आदिवासींना त्यांच्या जमिनीवर कायदेशीर हक्क मिळाले. आजही आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणारे जनसंगठन याच प्रेरणेतून काम करत आहेत.

आजच्या सभेत वक्त्यांनी स्पष्ट सांगितले की, बिरसाच्या आठवणीचा अर्थ म्हणजे आजच्या बेरोजगारी, महागाई, जंगल जमीन कायद्यातील बदल, खाजगीकरण, शोषण, शिक्षण व आरोग्य समस्यांवर जनआंदोलन उभारणे.

समाजप्रबोधनाचे आवाहन
समितीने नागरिकांना आवाहन केले की, बिरसाच्या विचारांचे गांभीर्य ओळखून सामाजिक सुधारणांसाठी कार्यरत व्हा. भाताची शराब, बलिप्रथा, अंधश्रद्धा या विरुद्ध लढा द्या, आणि आदिवासी संस्कृतीची खरी जपणूक करा.

“बिरसा मुंडा हयात असते तर तो सुद्धा आजच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला असता”, असेही वक्त्यांनी ठामपणे सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!