मुंब्रा रेल्वे अपघातात धक्कादायक ट्विस्ट! एका शंकेमुळे उपस्थित झाले अनेक प्रश्न; 4 जणांचा मृत्यू नेमका झाला तरी कसा?

Mumbra Train Accident: लोकल ट्रेनही मुंबईची लाईफ आहे. लाखो प्रवासी रोज रेल्वेने प्रवास करतात. मुंबई उपनरीय लोकलचा मुख्य रेल्वे मार्ग असलेल्या मध्य रेल्वेवर आज एक भयानक दुर्घटना घडली आहे. मुंब्रा स्टेशनजवळ लोकलमधून पडून 13 प्रवासी जखमी झालेत. तर या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाज्यात (फूटबोर्ड) लटकत उभे होते. त्याचवेळी बाजूने जाणारी लोकल या प्रवाशांना घासून गेली. या लोकलच्या धक्क्याने आठ प्रवासी ट्रेनमधून खाली पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली. याच मुंब्रा रेल्वे अपघातात धक्कादायक ट्विस्ट आला आहे. एका शंकेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामुळे 4 जाणांचा मृत्यू नेमका झाला तरी कसा या प्रश्नाचे गुढ वाढले आहे.
9 जून 2025 ही तारीख मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी जीवघेणी ठरली आहे. सकाळी 9.20 च्या दरम्यान, दिवा व मुंब्रा स्थानकांच्या दरम्यान ही घटना घडली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकलच्या दरवाजात उभ्या असणाऱ्या प्रवाशांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकलमधील प्रवाशांचा धक्का लागून ते खाली पडले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र हा अपघात नेमका कसा घडला याबाबत प्रत्यक्षदर्शींनीदेखील माहिती दिली आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी माहिती दिली. घडलेल्या घटनेचा तपास सुरू आहे. नक्की कारण अजून समोर आले नाही. CCTV फुटेज तपासले जात आहेत. ज्या लोकमधून प्रवासी पडले त्या लोकल मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आमची चर्चा सुरु आहे. प्रत्यक्षदर्शींनी चर्चा करुन नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले.
या रेल्वे अपघाताचे नेमके कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. ज्या लोकलमध्ये दुर्घटना घडली त्या लोकल मध्ये एक व्यक्तीला उलटी येत होती. रेल्वेत भांडण सुरू होते. असे त्या ट्रेन मध्ये प्रवास करणारे प्रवासी सांगत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भांडणामुळे तर हा अपघात झाला नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे. यामुळे ज्या डब्यातून प्रवासी खाली पडले त्या डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिलेली माहिती ही या अपघातातील अत्यंत महत्वाचा पुरावा ठरणार असून अपघात नेमका कसा झाला याचा उलगडा होण्यास मदत करेल. मात्र. प्रत्यक्षदर्शींनी दिलेली ठोस कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. 2024 रोजीच कोर्टाने असे अपघात टाळण्यासाठी रेल्वेला बंद दरवाजे लावावे हे सांगितले होते. त्यानुसार लवकरच सर्व लोकल गाड्यांना रेट्रो सिस्टम म्हणजे आटोमॅटिक बंद होणारे दरवाजे लावणार आहेत. तर, मुंबई सबरबनसाठी 238 AC लोकल येणार आहेत अशी महाती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.