माझे बलिदान देईल पण मागे हटणार नाही”: शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू
गुरुकुंज मोझरी – शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध प्रश्नांवर अपराजित लढ्याची शपथ घेत माजी मंत्री बच्चू कडू यांनी गुरुकुंज मोझरी येथे तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात बेमुदत अन्नत्याग आंदोलनास सुरुवात केली आहे. “माझी अंत्ययात्रा निघाली तरी बेहत्तर, पण मागे हटणार नाही,” असा ठाम पवित्रा घेत त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शेकडो कार्यकर्त्यांची साथ, समाधीस्थळी संघर्ष
या आंदोलनात बच्चू कडू यांच्यासोबत त्यांचे शेकडो कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. तुकडोजी महाराजांचे विचार आणि समतेचा संदेश देणाऱ्या गुरुकुंजच्या पवित्र स्थळी, सरकारच्या धोरणांविरोधातील हा संघर्ष एक सद्गृहस्थांचा सत्याग्रह बनू पाहतोय.
“शेतकरी राजा जिवंत राहिला पाहिजे” – बच्चू कडू
आंदोलनस्थळी बोलताना बच्चू कडू म्हणाले,
“भरकटलेली व्यवस्था सुधारण्यासाठीच मी आंदोलनाला बसलो आहे. ‘माझा बाप मेला तरी चालेल, पण नेता जिवंत राहिला पाहिजे’ अशी मानसिकता बदलणे आता आवश्यक आहे. माझा शेतकरी राजा बाप जिवंत राहिला पाहिजे, हाच खरा मुद्दा आहे.”
ते पुढे म्हणाले की, सोयाबीनच्या किमती 6000 वरून 4000 रुपयांवर आल्या, तुरीचे भाव हजारांनी घटले तरी कुणी पेटून उठत नाही. यामागे समाजात अंतर्गत संघर्ष पेरण्याचा कट असल्याची टीका त्यांनी केली.
“जातीय वादाचे विष सरकार पेरतेय” – तीव्र आरोप
बच्चू कडू यांनी केंद्र व राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका करताना म्हटले की,
“हिंदू-मुस्लीम, मराठा-ओबीसी यांच्यात वाद पेटवून समाजाला भांडणाच्या आगीत ढकलण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यातून शेतकरी, कष्टकरी वर्गाचे खरे प्रश्न मागे पडत आहेत.”
ते म्हणाले, “या विचलित करणाऱ्या राजकारणाविरुद्धचा रामबाण उपाय म्हणजे हे आंदोलन आहे. आणि वेळ आली तर, मी बलिदान देईल, पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय उठणार नाही.”
बच्चू कडूंच्या आंदोलनाची पुढील दिशा काय?
गुरुकुंज मोझरी येथून उभा राहिलेला हा अन्नत्याग आंदोलनाचा आवाज आता किती प्रखर होतो आणि शासन याला काय प्रतिसाद देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातून या आंदोलनाकडे लक्ष वेधले जात आहे.