अमरावतीत १४ जूनला जिल्हा काँग्रेसचा मशाल मोर्चा -मतदारांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणार”

अमरावती : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या गंभीर अनियमितता, मतमोजणीतील संशयास्पद घडामोडी आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत जिल्हा काँग्रेसने आता रस्त्यावर उतरायचा निर्णय घेतला आहे. येत्या १४ जून रोजी अमरावतीत भव्य मशाल मोर्चा काढण्यात येणार असून, या माध्यमातून मा. राष्ट्रपती आणि राज्यपालांना निवेदन देण्यात येणार आहे.
आज अमरावतीत झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. खासदार बळवत वानखडे हे प्रमुख उपस्थितीत होते. पत्रकार परिषदेला जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, युवा नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसची स्पष्ट भूमिका:
बबलू देशमुख म्हणाले, “ही निवडणूक निष्पक्ष नव्हती. मतदार यादीतील तांत्रिक चुका, ईव्हीएममध्ये हस्तक्षेप आणि प्रशासनाच्या दबावामुळे निवडणूक आयोगाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. काँग्रेसने वेळोवेळी आक्षेप नोंदवले तरी अद्याप कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.”
ते पुढे म्हणाले, “लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी जनता जागृत झाली पाहिजे. काँग्रेस पक्ष सत्ता मिळवण्यासाठी नव्हे, तर मूल्यांसाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे अमरावतीतील मशाल मोर्चा ही लोकशाहीच्या लढ्याची सुरुवात आहे.”
कामठीतील संशयास्पद मतवाढीचा आरोप:
देशमुख यांनी कामठी विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतांची संशयास्पद वाढ अधोरेखित केली. “लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे मत ११९ लाख होते, परंतु काहीच महिन्यांत ते १७५ लाखांवर गेले म्हणजे तब्बल ५६ लाखांची भर. कामठीत ३५ हजार नवीन मतदार अचानक नोंदवले गेले आणि त्यातील बहुसंख्य मते भाजपकडे गेली. ही बाब निवडणूक आयोगाने तातडीने तपासावी,” अशी मागणी त्यांनी केली.
बळवत वानखडेंचा इशारा:
खासदार बळवत वानखडे म्हणाले, “ही लढाई फक्त काँग्रेसची नाही. ही लढाई देशातील लोकशाही मूल्यांची आहे. कुठल्याही दबावाला झुकता कामा नये. संविधान, स्वातंत्र्य आणि जनतेचा अधिकार वाचवण्यासाठी आमचा संघर्ष सुरुच राहील.”