चांदूरबाजारच्या विश्रोली धरणावर प्रहार कार्यकर्ते व शेतकऱ्यांच जलसमाधी आंदोलन, दोन कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

चांदूरबाजार : राज्यातील शेतकरी, दिव्यांग, बेरोजगार, आणि अन्य वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाला आता तीव्र वळण लागले आहे. माजी राज्यमंत्री व प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू हे गेल्या तीन दिवसांपासून गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलनावर बसले असून, सरकारच्या दुर्लक्षामुळे प्रहार कार्यकर्ते व शेतकरी संतप्त झाले आहेत.
आज चांदूरबाजार तालुक्यातील विश्रोली धरणावर आंदोलनाच्या आक्रमक रूपात प्रहार कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान दोन कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, तात्काळ हस्तक्षेप करून त्यांना रोखण्यात यश आलं.
- आंदोलनाची ठळक वैशिष्ट्ये:
विश्रोली धरणाच्या जलपात्रात कार्यकर्त्यांनी उतरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. - आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना तातडीने काढण्यात आले.
- पोलिस आणि महसूल प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला.
आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क आहे.
बच्चू कडू यांचा इशारा:
“सरकार जर आंधळं आणि बहिरं झालं असेल, तर आमच्या अंगावर येण्याची तयारी ठेवा. आमचं आंदोलन आता निर्णायक वळणावर आहे.”
पार्श्वभूमी:
बच्चू कडू हे विदर्भातील संघर्षशील नेते असून, राज्यातील उपेक्षित घटकांसाठी सातत्याने आवाज उठवत आले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी त्यांनी आंदोलनांची मालिका सुरू ठेवली आहे. मात्र, यावेळी सरकारच्या दुर्लक्षामुळे कार्यकर्त्यांचा संयम सुटल्याचे दिसून येत आहे.