चांदूरबाजारमध्ये सरकारविरोधात मुंडण आंदोलन तर पूर्णा प्रकल्प धरणात आत्मदहन आंदोलन

चांदुर बाजार : राज्यातील शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी माजी राज्यमंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी देखील शासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे राज्यभर रोष व्यक्त केला जात असून, चांदूरबाजार तहसील कार्यालयावर आज (मंगळवार) सकाळी ११ वाजता शेकडो शेतकरी व दिव्यांग बांधवांनी मुंडन आंदोलन केले.
आंदोलनाची पार्श्वभूमी:
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तास्थापनेला अनेक महिने उलटले तरी या आश्वासनांची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे बच्चू कडूंनी सरकारविरोधात उपोषणाचा मार्ग स्वीकारत राज्यभर जनजागृतीचे रणशिंग फुंकले आहे.
प्रमुख मागण्या:
- शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी
- शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ
- मनरेगा मजुरीत वाढ
- शेतमजुरांना विमा संरक्षण
- सेंद्रिय खतांना अनुदान
- दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर
चांदूरबाजारमध्ये मुंडन आंदोलन:
शासनाच्या उदासीनतेचा निषेध म्हणून चांदूरबाजार तहसील कार्यालयावर प्रहार कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी मुंडन आंदोलन केले. संतोष किटुकले (तालुकाध्यक्ष, प्रहार) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ‘शासन जागे हो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आत्मदहनाची टोकाची भूमिका:
दरम्यान, पूर्णा मध्यम प्रकल्प विस्थापित शेतकऱ्यांनी विश्रोळी धरण परिसरात मंगेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आत्मदहनाचा इशारा देत तीव्र आंदोलन केले आहे. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली असून, सुरक्षेचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आंदोलनकर्त्यांचा इशारा:
“हा लढा केवळ शेतकऱ्यांचा नाही, तर सर्वसामान्य जनतेच्या हक्कांचा आहे. सरकारने आम्हाला गृहीत धरले आहे, पण यावेळी आम्ही माघार घेणार नाही,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.