देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला न्याय द्यावा-हेमंत पाटील

पुणे : केंद्रीय पुरातत्व विभागाने रायगडावर वास्तव्याला असलेल्या रहिवाश्यांना परिसर खाली करण्याची नोटीस दिली आहे. धनगर वस्तीतील नागरिकांना त्यामुळे पिढीजात जागा सोडण्याची वेळ आली आहे. परंतु,या मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ योग्य तोडगा काढत धनगर समाजाला न्याय द्यावा,अशी विनंती इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी मंगळवारी (ता.१०) केली.
रायगड हा ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून संरक्षित आहे.एएसआयच्या नियमानुसार गडावरील कुठलेही अतिक्रमण, नवीन बांधकाम बेकायदेशीर असल्याने धनगर वस्तीतील नागरिकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.७ पिढ्यांपासून गडावर वास्तव्य असलेल्या धनगर बांधवांवर त्यामुळे बेघर होण्याची वेळ आली आहे.केंद्र सरकार सोबत यासंदर्भात फडणवीस यांनी चर्चा करीत विशेष बाब म्हणून धनगर वस्ती कायम ठेवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावे,अशी विनंती पाटील यांनी केली.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या न्यायाने गरीब बांधवांना सरकारने न्याय द्यावा,असे आवाहन पाटील यांनी केले.
रायगडावर बाजारपेठ जगदीश्वर मंदिराच्या खालच्या परिसरात धनगर बांधवांची घरे आहेत.गडावर येणाऱ्या पर्यटक, शिवप्रेमींना दूध, दही, ताक, नाश्ता, जेवण देऊन हॆ कुटुंबीय उदरनिर्वाह करतात.गेल्या ७०० वर्षांपासून धनगर समाज गडावर वास्तव्याला आहे. स्वराज्यासाठी शिवकार्यात धनगर समाजाने देखील शौय गाजवले आहे. गडाचे संरक्षण, शिवकाळात पशुपालन, दूध उत्पादनासह स्वराज्याची लढाई लढण्याचे कार्य समाजाने केले आहे. अशात केवळ गरिबांची झोपडी अतिक्रमण म्हणून काढून घेऊ नाही,असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
इतर गडावर असलेले अतिक्रमण सरकारने खुशाल काढावे, मात्र धनगर वस्तीला विशेष बाब म्हणून वास्तव्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पाटील यांनी केली.धनगर आणि ओबीसी नेत्यांनी या मुद्द्यावर एकत्रित येऊन केंद्र सरकार सोबत पत्रव्यवहार करीत धनगर वस्ती वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यांसदर्भात पत्र पाठवत धनगर वस्ती कायम ठेवण्याची विनंती करणार असल्याचे पाटील म्हणाले