नांदेडमध्ये वादळी वाऱ्याचा कहर! अर्धापूर-मुदखेड तालुक्यात केळी बागा उद्ध्वस्त

नांदेड : नांदेड जिल्ह्यात काल रात्री आलेल्या वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. विशेषतः आंबेगाव, लहान चाभरा, पागरी आणि परिसरातील गावांमध्ये शेकडो एकर क्षेत्रावरील केळीच्या बागा वाऱ्यामुळे आडव्या झाल्या असून पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत.
वादळाच्या जोरामुळे अनेक घरांची पत्रे उडाली असून, झाडे उन्मळून पडल्याचेही वृत्त आहे. फळबागांनाही याचा फटका बसला असून नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत घेऊन उभी केलेली केळी आता काढणीसाठी तयार होती. मात्र, वादळी वाऱ्यामुळे हातात आलेला घास हिरावला गेला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अत्यंत हताश आणि निराश झाले आहेत.
शेतकऱ्यांची मागणी:
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. तसेच, नुकसानग्रस्त गावांमध्ये तातडीने मदत कार्य सुरू करावे, अशीही मागणी केली जात आहे.